संध्याकाळपर्यंत विद्यार्थी ताटकळत : परीक्षा केंद्रावर गोंधळ
प्रतिनिधी /बेळगाव
प्रथम वर्षातील आयटीआयच्या विद्यार्थ्यांची बुधवारी ऑनलाईन थेअरी परीक्षा होती. परंतु परीक्षा केंद्रांवरील सर्व्हरडाऊन झाल्याने या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागले. सर्व्हर पुन्हा येईल व परीक्षा सुरू होईल, या आशेने सकाळपासून संध्याकाळपर्यंत विद्यार्थी ताटकळत होते. अखेर नाईलाजास्तव हे विद्यार्थी रात्री उशिरा घरी परतले. काही विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घालून आपली नाराजी व्यक्त केली.
आयटीआयच्या प्रथम वर्षाच्या परीक्षा दरवषी ऑगस्ट महिन्यात होतात. परंतु यावषी कोरोनामुळे ही परीक्षा ऑक्टोबर महिन्यात घेतली जात आहे. प्रॅक्टिकल परीक्षा प्रत्येक कॉलेजमध्ये घेण्यात आली असून, थेअरी परीक्षा एनसीव्हीटीने मान्यता दिलेल्या केंद्रांवरच घेण्यात येणार होती. बेळगाव जिल्हय़ाचे ठिकाण असल्यामुळे निपाणी, रायबाग, कित्तूर, खानापूर व बेळगाव तालुक्मयातून विद्यार्थी सकाळी 7 वाजताच परीक्षा केंद्रांवर दाखल झाले होते. सकाळी 8 ते सायंकाळी 5 यावेळेत दोन सत्रांमध्ये ही परीक्षा घेतली जाणार होती.
शिक्षणाधिकाऱयांनी तोडगा काढावा
सर्व्हरडाऊनमुळे सकाळपासूनच परीक्षा होऊ शकल्या नाहीत. सर्व्हर सुरळीत होऊन परीक्षेला सुरुवात होईल, अशी आशा असणारे विद्यार्थी दिवसभर परीक्षा केंद्रांवर ताटकळत होते. परंतु सायंकाळपर्यंत सर्व्हरडाऊनच राहिल्याने विद्यार्थ्यांना माघारी फिरावे लागले. गुरुवारीदेखील थेअरी परीक्षा असून, त्यावेळीही हीच समस्या आल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱयांनी यावर तोडगा काढून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली.
परीक्षा केंद्रांबाहेर गोंधळ
सर्व्हरडाऊन झाल्याने संतापलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रांबाहेर गोंधळ घालण्यास सुरुवात केली. सरकारी आयटीआय कॉलेजच्या प्राचार्यांनी सर्व्हरडाऊन असल्याचा अहवाल तांत्रिक शिक्षण मंडळाकडे पाठवावा. तसेच यापुढे सर्व्हरडाऊनची समस्या येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी यावेळी केली.