नवी दिल्ली : भारतीय संघातर्फे कसोटी पदार्पण करणाऱया सर्वात तरुण खेळाडूंपैकी एक असलेल्या पार्थिव पटेलने बुधवारी सर्व क्रिकेट प्रकारातून आपली निवृत्ती जाहीर केली. आपल्या ट्वीटर व इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन त्याने निवृत्तीची घोषणा केली. तीन महिन्यांच्या अंतराने पार्थिव 36 व्या वर्षात पदार्पण करणार आहे.
छोटय़ा मुलांप्रमाणे असलेल्या चेहऱयासाठी विशेष ओळखल्या गेलेल्या पार्थिवने 17 वर्षे 153 दिवस वय असताना सौरभ गांगुलीच्या नेतृत्वाखाली कसोटी पदार्पण केले होते. त्याने भारतीय संघातर्फे 65 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून यात 25 कसोटी, 38 वनडे व 2 टी-20 लढतींचा समावेश आहे.
‘मी आज सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत आहे. 18 वर्षांच्या या प्रदीर्घ प्रवासात मला अनेकांचे सहकार्य लाभले. या सर्व घटकांचा मी मनापासून आभारी आहे’, असे 35 वर्षीय पार्थिव येथे म्हणाला. डावखुऱया पार्थिवने सर्व क्रिकेट प्रकारात एकत्रित 1696 धावा केल्या आणि कसोटी क्रिकेटमधील त्याचा वाटा 6 अर्धशतकांसह 934 धावांचा राहिला.
वनडे क्रिकेटमध्ये त्याने 4 अर्धशतकासह 736 धावांचे योगदान दिले. यात 95 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याने कसोटीत यष्टीमागे 72 बळी टिपले. त्यात 62 झेल व 10 यष्टीचीत बळींचा समावेश राहिला. पार्थिवने 2002 मधील हंगामात पहिल्या टप्प्यात पदार्पण केले. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत भारत अ संघातर्फे खेळल्यानंतर त्याला इंग्लंडला पाठवण्यात आले होते.
आश्चर्य म्हणजे त्यापूर्वी पार्थिवने अगदी रणजी क्रिकेट स्पर्धेतही पदार्पण केले नव्हते. पुढे 2004 मध्ये भारतीय संघातून डच्चू मिळाल्यानंतर त्याने रणजी क्रिकेट स्पर्धेतील आपला पहिला सामना खेळला. ऑस्ट्रेलिया व पाकिस्तान दौऱयातील खराब कामगिरीनंतर त्याला वगळले गेले होते.
धोनी यष्टीरक्षणातील सर्वोत्तम पर्याय म्हणून उदयास येत असताना ज्याप्रमाणे दिनेश कार्तिकला त्याचा फटका बसला, त्याचप्रमाणे पार्थिव पटेलला देखील बसला. अर्थात, प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पार्थिवने उत्तम जम बसवला आणि तिकडेच त्याने लक्षही केंद्रित केले. पार्थिवने 194 प्रथमश्रेणी लढतीत 27 शतके व 43 पेक्षा अधिक सरासरीने 11240 धावा नोंदवल्या.
याशिवाय, 194 लिस्ट ए सामन्यात व 204 टी-20 सामन्यातही त्याने उत्तम योगदान देण्याचा प्रयत्न केला. छोटय़ा चणीच्या पार्थिवने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपरकिंग्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगळूर प्रँचायजीचेही प्रतिनिधीत्व केले. 2016-17 मधील रणजी स्पर्धा गुजरातला जिंकून दिली, हा त्याच्या प्रथमश्रेणी कारकिर्दीचा मानबिंदू ठरला.