अफगाणिस्तानसंबंधीच्या सर्वपक्षीय बैठकीत सरकारची माहिती : 31 पक्षांची उपस्थिती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंद्र सरकारने अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर गुरुवारी सर्वपक्षीय बैठक घेतली. यामध्ये परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर यांनी विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांना अफगाणिस्तानमधील परिस्थिती आणि बचाव मोहिमेबद्दल माहिती दिली. जवळपास साडेतीन तास चाललेल्या सर्वपक्षीय बैठकीला 31 पक्षांचे 37 नेते उपस्थित राहिले. अफगाणमधील परिस्थिती विदारक असून सध्या तेथील भारतीय नागरिकांना सुरक्षितपणे मायदेशी आणण्यावर सरकारने भर दिल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी या बैठकीत सांगितले. ऑपरेशन देवी शक्ती अंतर्गत काबूलमधून शेकडो भारतीयांना आतापर्यंत आणण्यात आले असून अजूनही काही भारतीय काबूलमध्ये अडकले आहेत. आम्ही सर्वांना परत आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अफगाण प्रश्नासंदर्भात एक महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक गुरुवारी दिल्लीत पार पडली. तालिबान्यांच्या विळख्याने येथील स्थिती गेल्या काही दिवसात झपाटय़ाने चिघळलेली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीयांना विश्वासात घेण्याचा हा सरकारचा पहिलाच प्रयत्न होता. अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा घेतल्यानंतर भारताची भूमिका नेमकी काय असणार? सरकार तालिबान्यांसोबत चर्चा करणार की नाही? भविष्यात अफगाणिस्तानसोबत नेमके कसे संबंध असणार? तिथल्या परिस्थितीमुळे भारतात दहशतवादाचा धोका वाढू शकतो का? असे अनेक प्रश्न घोंगावत असतानाच त्यासंबंधी केंद्र सरकारने एक महत्त्वाची सर्वपक्षीय बैठक बोलावत सद्यस्थितीची माहिती देशातल्या सर्व प्रमुख नेत्यांना दिली.
महाराष्ट्रातून राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शिवसेनेचे गजानन किर्तीकर या बैठकीला हजर होते. तसेच लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी, राज्यसभेचे नेते मल्लिकार्जुन खर्गे, द्रमुकचे टीआर बालू, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि अनुप्रिया पटेल या बैठकीला उपस्थित होते. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या बैठकीला संबोधित केले. त्यानंतर परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला यांनी एक प्रेझेंटेशन सादर करत सद्यस्थितीची माहिती दिली. सर्व पक्षांशी चांगली चर्चा झाली असून सरकारसह सर्व पक्षांचे मत समान असल्याचे परराष्ट्रमंत्र्यांनी बैठकीनंतर स्पष्ट केले.
तालिबानींकडून करारभंग
एस. जयशंकर यांनी बैठकीमध्ये 2020 मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात दोहामध्ये झालेल्या कराराचा संदर्भ दिला. तालिबानने दोहामध्ये दिलेल्या आश्वासनाचे पालन केले नसल्याचा दावा परराष्ट्रमंत्र्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जयशंकर यांना सर्व पक्षांना अफगाणिस्तानमधील परिस्थितीची माहिती देण्याच्या सूचना दिल्या होत्या. विरोधी पक्षांनीही सरकारला अफगाणिस्तानबाबत निवेदन जारी करण्यास सांगितले आहे.
अफगाणमधून गुरुवारी 35 जण भारतात दाखल
अफगाणिस्तानमधून गुरुवारी 35 जणांना भारतात आणण्यात आले. हवाई दलाच्या विमानाने 24 भारतीय आणि 11 नेपाळी नागरिक काबूलहून दिल्लीत आले आहेत. अफगाणिस्तानातील लोकांना मायदेशी आणण्याबरोबरच तेथील परिस्थितीवर सरकार बारीक लक्ष ठेवून आहे. आतापर्यंत अफगाणिस्तानातून 800 हून अधिक लोकांना भारतात आणण्यात आले आहे.
तालिबानबाबत भारताची भूमिका विशद
काही दिवसांपूर्वी एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली होती. अफगाणिस्तानसोबत आपले ऐतिहासिक संबंध आहेत. अफगाण लोकांशी आमचे संबंध नक्कीच चालू राहतील. पण त्यांना दहशतवादाला आवर घालावीच लागेल. तसेच तालिबानने हिंसाचाराचा मार्ग सोडून द्यावा आणि दहशतवादी संघटनांशी संबंध संपवावेत, असे संयुक्त राष्ट्रात भारताचे राजदूत टी. एस. तिरुमूर्ती यांनी म्हटले होते. याचसंबंधी तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी तालिबान भारताशी चांगले संबंध निर्माण करण्यास उत्सुक असल्याचे म्हटले होते.
…‘घरवापसी’ला प्राधान्य !
अफगाणिस्तानमधील परिस्थिती पूर्णपणे अस्थिर आहे. आम्ही ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहोत. सध्या सरकारने केवळ भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.
– एस. जयशंकर, परराष्ट्रमंत्री
बैठकीत उपस्थित मुद्दे…
- भारतासह अनेक देशांचे तालिबानच्या सत्तासंघर्षाकडे सध्या पूर्ण लक्ष
- अफगाणमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करणे हीच प्राथमिकता
- अफगाणमधील तालिबानच्या वर्चस्वामुळे देशाला दहशतवादाचा धोका
- तालिबानी दहशतवादापासून देशाच्या सुरक्षेसाठी संरक्षण यंत्रणा सतर्क