ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रिय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी बुधवारी पासपोर्ट सेवा दिनानिमित्त देश आणि देशाबाहेर पासपोर्ट देणाऱ्या भारतीय अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना महामारी दरम्यान केलेल्या कामाचे कौतुक केले आणि देशातील पासपोर्ट सेवा केंद्रांची संख्या वाढविण्याबाबतची योजना आणि ई – पासपोर्ट या विषयांवर चर्चा केली.
जयशंकर म्हणाले, पासपोर्ट सेवा दिनानिमित्त मी देशातील आणि विदेशात पासपोर्ट देणाऱ्या अधिकाऱ्यांचा सन्मान करतो. आपण खूप वेगळ्या परिस्थितीत बैठक घेत आहोत. सध्या संपूर्ण जगात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे. या अशा कठीण परिस्थितीत देखील आपण सर्वजण चांगले काम करत आहात.
पुढे ते म्हणाले, आम्ही आता सर्व लोकसभा विभागात पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा विचार करत आहोत, जिथे अजून एकही पासपोर्ट सेवा केंद्र नाही आहे. पुढे ते म्हणाले आतापर्यंत 488 लोकसभा निवडणूक क्षेत्रात ही सेवा दिली आहे. सतत पुढे पुढे जात असलेली ही प्रक्रिया कोरोना संकटामुळे काही काळासाठी स्थगित झाली आहे.
पुढे ते म्हणाले, चीप सक्षम पासपोर्टसाठी भारतीय सुरक्षा प्रेस नाशिक आणि राष्ट्रीय सूचना-विज्ञान केंद्र सोबत काम करत आहोत. ई – पासपोर्टची ओळख आमच्या देशाविदेशात जाण्यासाठी लागणारा कागदपत्रांच्या सुरक्षिततेला अधिक मजबूत करेल. यासाठी लागणारी प्रक्रिया सुरू केली आहे आणि हे कार्य लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असे ही त्यांनी यावेळी सांगितले.