नाईट कर्फ्यूबाबत एकाच गावात वेगवेगळी नियमावली
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला आहे. याअंतर्गत हिंडलगा परिसरात रात्री 8.30 पासूनच दुकाने बंद करण्यासाठी बडगा उगारला जातो. मात्र विजयनगर, गणेशपूर परिसरात रात्री उशिरापर्यंत व्यवसाय सुरू ठेवण्याची मुभा आहे. त्यामुळे एकाच गावात नाईट कर्फ्यूसाठी वेगवेगळी नियमावली लागू करण्यात आल्याने यामागचे गौडबंगाल काय? अशी विचारणा नागरिक करीत आहेत.
कोरोनाचा प्रसार झाल्याने राज्यात लॉकडाऊनबरोबरच नाईट कर्फ्यू जारी करण्यात आला होता. मात्र रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने लॉकडाऊन मागे घेऊन विकेंड कर्फ्यू व नाईट कर्फ्यू कायम ठेवण्यात आला होता. पण अलीकडे विकेंड कर्फ्यूदेखील मागे घेण्यात आला असून रात्री 9 ते सकाळी 6 पर्यंत नाईट कर्फ्यू कायम आहे. त्यामुळे रात्री 9 वा. सर्व दुकाने बंद करण्याचा आदेश असून याकरिता पोलीस प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी केली जाते. नाईट कर्फ्यूच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांचे पथक कार्यरत आहे. प्रत्येक परिसरात नाईट कर्फ्यूसाठी गस्तीच्या वाहनांची नियुक्ती करण्यात आली असल्याने दुकाने बंद करण्यासाठी रात्री 8 ते 8.30 पासूनच सायरन वाजविले जाते. हिंडलगा परिसरात बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर असलेल्या व्यावसायिकांना दुकाने बंद करण्यासाठी 8.30 पासूनच सक्ती केली जाते. दुकाने बंद न केल्यास दुकानासमोर गस्तीचे वाहन लावून पोलीस कर्मचारी व्यावसायिकांना आरडाओरड करतात. त्यामुळे व्यावसायिकांना 8.30 वा. दुकाने बंद करावी लागत आहेत.
पण परिसरातील हॉटेल रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर असलेल्या सर्व हॉटेलमध्ये रात्री 11 पर्यंत गर्दी असते. तसेच रामघाट रोडवर रात्री 9.30 पर्यंत व्यवसाय करण्याची मुभा देण्यात आली आहे. तर मुख्य रस्ता वगळून गावामध्ये असलेली सर्व दुकाने रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. त्यामुळे कोरोनाचे नियम गणेशपूर, विजयनगर परिसरातील व्यावसायिक आणि हॉटेल चालकांना लागू नाहीत का? अशी विचारणा हिंडलगा परिसरातील व्यावसायिक करीत आहेत. अन्य व्यवसाय बंद ठेवण्याची सक्ती करून केवळ हॉटेल चालकांना उशिरापर्यंत व्यवसाय करण्याची मुभा देण्यामागचे गौडबंगाल काय? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. हिंडलगा परिसरातील व्यावसायिकांना रात्री 9 पर्यंत व्यवसाय करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी होत आहे.