मात्र दहा दिवसांचे विलगीकरण सक्तीचे
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कर्णधार मनप्रीत सिंगसह पुरुष हॉकी संघातील सहा हॉकीपटू कोव्हिड -19 बाधेतून मुक्त झाले असून सोमवारी संध्याकाळी त्यांना बेंगळूरमधील हॉस्पिटलमधून सोडण्यात आले आहे.
संघासमवेत असलेल्या सूत्राने सांगितले की, मनप्रीत, डिफेंडर सुरेंदर कुमार, जस्करन सिंग, वरुण कुमार, गोलरक्षक कृशन बहादूर पाठक व स्ट्रायकर मनदीप सिंग यांची दोनदा चाचणी घेण्यात आली आणि दोन्ही वेळेस त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून ते आता नॉर्मल झाले आहेत. 10 ते 12 ऑगस्ट या कालावधीत झालेल्या चाचणीत ते पॉझिटिव्ह आढळून आले होते. ‘सर्व हॉकीपटू कोरोनाबाधेतून आता पूर्णपणे बरे झाले असून संध्याकाळी त्यांना सोडण्यात आले आहे,’ असे या सूत्राने सांगितले.
मनदीपला लागण झालेली असली तरी त्याची लक्षणे दिसून आली नव्हती. मात्र रक्तातील ऑक्सिजनचा स्तर कमी झाल्याचे आढळल्यानंतर त्यालाच सर्वप्रथम बेंगळूरमधील एसएस स्पर्श हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. नंतर मनप्रीत व अन्य चार हॉकीपटूंनाही सावधगिरी म्हणून याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. बुधवारपासून आता पुरुष व महिला हॉकीपटूंचे बेंगळूरमध्ये सराव शिबिर सुरू होणार आहे. मात्र कोरोना बाधेतून बरे झालेल्या सहा जणांना लगेचच शिबिरात सामील केले जाणार नाही. त्यांना काही दिवस विलगीकरणात राहिल्यानंतर शिबिरात सामील करून घेतले जाणार आहे.
सध्या 33 पुरुष व 24 महिला हॉकीपटू बेंगळूरमधील शिबिरात आहेत. सदर राष्ट्रीय शिबिर 30 सप्टेंबरपर्यंत घेतले जाणार आहे. ‘सरकारच्या नियमावलीनुसार बरे झालेल्या खेळाडूंना साई कॅम्पसमध्ये एक आठवडा ते दहा दिवसासाठी विलगीकरणात राहणे सक्तीचे असून त्यानंतरच ते शिबिरात सराव सुरू करू शकतील,’ असे या सूत्राने स्पष्ट केले. महिला हॉकीपटूंचे बेंगळूरमध्ये आगमन झाल्यानंतरच साईने त्यांची चाचणी घेतली होती आणि त्यात सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आला होता.