अचूक बातमी “तरुण भारत”ची, सोमवार 18 ऑक्टोबर 2021, स. 11.30
● रविवारी रात्री अहवालात 52 बाधित
● एकूण 3,500 जणांची तपासणी
● आर्थिक मदतीबाबत प्रशासन अनभिज्ञ
● मदत मिळण्याच्या अफवा सुरूच
सातारा / प्रतिनिधी :
ऑक्टोबर महिन्यातील 11 तारखेपासून बाधित वाढीचा आलेख 100 च्या खाली घसरला. त्यामुळे मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत कोरोनाचा कहर अनुभवलेल्या सातारा जिल्हावासियांना दिलासा मिळू लागला आहे. जुलै ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाचा कहर कमी होऊ लागला आणि सप्टेंबर महिन्यात तो शंभर दोनशेच्या आसपास स्थिर राहिला होता. आता ऑक्टोबर महिन्यात बाधित वाढ शंभरच्या खाली राहिली असून सलग आठव्या दिवशी देखील हा दिलासा मिळालेला आहे. 11 ऑक्टोबर रोजी बाधित वाढीचा आलेख शंभरच्या खाली आला. त्यादिवशी 75 नवीन त्यांची नोंद झाली होती. त्यानंतर 16 तारखेला 47 एवढी गत आठ महिन्यांतील नीचांकी बाधित वाढ झाली. रविवारी रात्री अहवालात देखील फक्त 52 जणांचा अहवाल बाधित आला आहे.
बाधित वाढ पन्नासच्या नजीक
रविवारी प्रशासनाकडून पोर्टलवरून देण्यात आलेल्या अहवालानुसार 3,500 जणांची तपासणी करण्यात आली यामध्ये 52 जणांचा अहवाल बाधित आलेला आहे. यामुळे जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर 2.36 टक्के एवढा राहिलेला असून गेल्या दोन महिन्यापासून जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर दोन टक्के वर स्थिर आहे तो आणखी खाली येण्याची गरज आहे.
लसीकरणमुळे भीती गायब पण काळजी घ्या
जिल्ह्यात मध्यंतरी शासनाकडून लसीकरण मोहीम थंडावली होती. मात्र त्यानंतर गत महिन्यापासून लसीकरणाला मोठा वेग आला असून आजमिती पर्यंत जिल्ह्यात एकूणच घेणाऱ्यांची संख्या सत्तावीस लाखांच्या पुढे गेलेले असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्यांची संख्या 20 लाखांहून अधिक आहे तर दुसरा डोस घेतलेल्यांची संख्या साडे आठ लाखानजिक आहे. बाधित वाढ मंदावली आणि लसीकरणाचे गती वाढली यामुळे नागरिकांच्या मनातील भीती कमी झालेली असली तरी अद्यापही गर्दीच्या ठिकाणी जाताना नागरिकांनी नियम पाळण्याची गरज आरोग्य विभाग व प्रशासनाकडून व्यक्त केली जात आहे.
आर्थिक मदतीबाबत प्रशासन अनभिज्ञ
ज्या-ज्या कुटुंब प्रमुखांचा कोरोनामुळे बळी गेला आहे, त्या-त्या कुटुंबांना केंद्र सरकारकडून 50 हजार रुपयांची मदत मिळणार असल्याच्या अफवा व त्या संदर्भातील अर्ज देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्याबाबत यापूर्वी ही बाब प्रशासनाच्या नजरेस बातमीतून आणून देखील देखील अद्याप प्रशासन याबाबत अनभिज्ञता आहे. प्रशासनाकडून याबाबत काहीही सांगण्यात आलेले नाही. मात्र ज्यांच्या घरात धोरणामुळे बळी गेलेले आहेत असे अनेक लोक अशी काही मदत मिळते का हे पाहण्यासाठी शासकीय कार्यालयाकडे चौकशीसाठी जात आहेत. त्यामुळे हा नेमका प्रकार काय आहे याबाबत प्रशासनाने सांगायला हवे अशी नागरिकांची मागणी आहे.
रविवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमुने 27,13,464
एकूण बाधित 2,50,453
एकूण कोरोनामुक्त 2,42,255
एकूण मृत्यू 6,385
सक्रीय रुग्ण 1,105
रविवारी जिल्हय़ात
बाधित 72
मुक्त 342
मृत्यू 00