ईश्वरप्पांच्या राजीनाम्याच्या मागणीवर काँग्रेस ठाम
प्रतिनिधी/ बेंगळूर
ग्रामविकासमंत्री के. एस. ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून काँग्रेस आमदारांनी हाती घेतलेले धरणे आंदोलन शुक्रवारीही सुरूच होते. त्यामुळे सलग तिसऱया दिवशीही विधानसभेच्या कामकाजात व्यत्यय निर्माण झाला. शुक्रवारी सकाळी कामकाजाला सुरुवात होताच काँग्रेस आमदारांनी घोषणाबाजी केली. दरम्यान झालेल्या गदारोळामुळे विधानसभेचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले. विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे कामकाज सोमवारपर्यंत लांबणीवर टाकण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर देखील काँग्रेसचे आमदार सभागृहाबाहेर पडले नाहीत. त्यांनी गुरुवारप्रमाणेच शुक्रवारी देखील सभागृहात अहोरात्र धरणे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारीही ते सभागृहातच राहणार आहेत.
शुक्रवारी सकाळी विधानसभेच्या कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर विधानसभेचे अध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी प्रश्नोत्तर चर्चेला सुरुवात केली. मात्र, मंत्री ईश्वरप्पा यांनी राष्ट्रध्वजाचा अवमान केला असून त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेस आमदारांनी केली. त्यांनी सभाध्यक्षांच्या आसनासमोर जाऊन धरणे छेडत घोषणाबाजी केली. त्यावेळी सभाध्यक्षांसह सत्ताधारी आमदारांनी त्यांना धरणे मागे घेण्याची विनंती केली. मात्र त्याचा कोणताही परिणाम काँग्रेस आमदारांवर झाला नाही. त्यामुळे गदारोळातच प्रश्नोत्तर चर्चा सुरू झाली. त्यानंतर कायदामंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी केएएस अधिकाऱयांची 2011 मधील निवड वैध ठरविण्यासंबंधीचे विधेयक मांडले. याचवेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई, गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र, कायदामंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी काँग्रेस आमदारांच्या भूमिकेचा निषेध नोंदविला. धरणे मागे घेऊन सभागृहाचे कामकाज सुरळीत चालण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करावी, अशी सातत्याने विनंती करून देखील काँग्रेस आमदार आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. त्यामुळे सभाध्यक्षांनी कामकाज सोमवारी सकाळी 11 पर्यंत लांबणीवर टाकले.
काँग्रेस आमदारांना निलंबित करा!
मंत्री ईश्वरप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करून धरणे आंदोलन करणाऱया काँग्रेसच्या आमदारांना निलंबित करण्यात कोणती अडचण आहे, असा प्रश्न विधानसभेचे माजी सभाध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार रमेशकुमार यांनी केला. विधानसभेत शुक्रवारी काँग्रेसच्या धरणे आंदोलनाला आक्षेप घेऊन कायदामंत्री जे. सी. माधुस्वामी यांनी टीका केली. त्यानंतर रमेशकुमार यांनी सभाध्यक्षांना उद्देशून “आम्हाला निलंबित करा’’, असे आव्हान दिले. त्यामुळे काहीसे संतप्त झालेले सभाध्यक्ष विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी “लेखी द्या; मगच निलंबित करतो. तुमच्या नेत्यांना सांगून निलंबित करण्याबाबत लेखी स्वरुपात द्या, असे सांगितले.
त्यावर रमेशकुमार यांनी आमच्या नेत्यांशी चर्चा करूनच मी बोलत आहे, असे प्रत्युत्तर दिले. त्यावेळी निजदचे आमदार एच. डी. रेवण्णा यांनी मध्येच हस्तक्षेप केला. त्यांनी “रमेशकुमार यांनी त्यांच्या पक्षातील आमदारांना निलंबित करण्यास सांगितले आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करून आम्हाला कामकाजात सहभागी होऊन बोलण्याची संधी द्या’’, अशी विनंती सभाध्यक्षांकडे केली. तेव्हा सभाध्यक्ष कागेरी मुख्यमंत्र्यांना उद्देशून म्हणाले, रमेशकुमार यांनी काँग्रेस आमदारांना निलंबित करण्यास सांगितले आहे. त्याला रेवण्णा यांनी अनुमोदन दिले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमधील आमदारांच्या भूमिकेवर टिकेची झोड उठवली. तसेच या नाटय़ावर पडदा टाकण्याची विनंती सभाध्यक्षांकडे केली.