सातारा /गौरी आवळे
साता-यातील गणेशोत्सवात दरवर्षी सामाजिक विषय मांडत गणेश मंडळे देखावे सादर करतात. जिवंत देखावे आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. या देखाव्याच्या माध्यमातून अनेक प्रबोधनात्मक संदेश भक्तापर्यंत पोहचवले जातात. परंतु गतवर्षी निर्माण झालेली पूरस्थिती मुळे देखावे सादर झाले नाहीत. आणि चालू वर्षी कोरोनाचे संकट निर्माण झाल्याने देखावे सादर होणार नसल्याचे मंडळाच्या वतीने सांगण्यात येत आहे.
गणरायाच्या नावाचा जयषोघ करत गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरु असते. कुंभारवाड्यात विविध रुपातील मूर्ती बनवण्याचे काम उन्हाळ्यापासून सुरु असते. घराघरात गणरायाचे आगमन होणार म्हणून महिन्याभर आधी बाजारपेठा सजावटीच्या साहित्यानी सजलेल्या असतात. दरवर्षी शहरातील गणेश मंडळे सामाजिक संदेश देणारे उपक्रम राबवत असतात.यामध्ये सम्राट चौकातील व्यापारी गणेश मंडळाने गणेशोत्सवात सजावटीसाठी जलमंदीरची प्रतिकृती उभारली होती. या शिवाय काही ठराविक मंडळांनी आकर्षक सजावट व सजीव देखावे सादर केले होते.
यामध्ये फुटका तलाव गणेशोत्सव मंडळाने झी मराठी वाहिनीवर सुरु असलेल्या संभाजी राजे या ऐतिहासिक विषयावर देखावा सादर केला होता. या मंडळांची जिवंत देखावे सादर करण्याची परंपराच आहे. दरवर्षी समाजप्रबोधात्मक देखावे मंडळातर्फे सादर केले जातात. त्यानंतर सोमवार पेठेतील अजिंक्य गणेशोत्सव मंडळाने पतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छता मिशनवर देखावा सादर केला होता. याच पेठेतील गजराज गणेशोत्सव मंडळाने खाकी एक शौर्याची कथा या विषयावर पोलीस खात्यावर आधारित देखावा सादर केला होता. गणेश भक्तांना उत्सुकता असते ती बाल विकास गणेशोत्सव मंडळाच्या देखाव्याची. प्रत्येक वर्षी जिवंत देखावे सादर करण्याची मंडळाची परंपरा आहे.
मारवाडी भुवन गणेश मंडळाने अष्टविनायक दर्शनाचा सेट व शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, असा संदेश देणारा देखावा सादर केला होता. मंडळासोबत घरामध्येही देखावे सादर करण्याची परंपरा आहे.
मात्र गतवर्षी जुलै महिन्यात पावसाचा जोर वाढल्याने सातारासह सांगली, कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाली होती. या पूरामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले होते. भयान परिस्थिती निर्माण झाल्याने शहरातील गणेश मंडळांनी देखावे सादर न करता पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला होता. यामुळे गतवर्षी देखावे सादर न होण्याचे पहिलेच वर्ष मानले जात असताना यंदा कोरोनाची गडद छाया गणेशोत्सवावर पसरली आहे.
मार्च महिन्यात लाँकडाऊन करण्यात आले. यामुळे जिल्हातर्गंत वाहतूक बंद झाल्याने गणेश मूर्तीसाठी कच्चा माल उपलब्ध झाला नाही. व बाधित रुग्ण वाढल्याने यंदा गणेशोत्सव साजरी करण्यासाठी परवानगी मिळणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता. यामुळे मंडळांनी देखावे, सजावट न करता यंदाचा गणेशोत्सव साध्या पणाने साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही मंडळे सामाजिक उपक्रम राबवणार आहेत.