नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात कोरोनाबाधितांच्या संख्येत सलग पाचव्या दिवशी घट झाल्याचे पाहायला मिळाले. 9 सप्टेंबरपासून देशात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येत घट झाली. आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 25 हजार 404 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. याचदरम्यान गेल्या 24 तासांत 339 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. तर 37 हजार 127 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत.
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 3 कोटी 32 लाख 89 हजार 579 रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी 4 लाख 43 हजार 213 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 3 कोटी 24 लाख 84 हजार 159 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाखांहून कमी आहे. एकूण 3 लाख 62 हजार 207 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत.
केरळमधील संसर्गही नियंत्रणात
केरळातील कोरोनाबाधितांच्या नव्या रुग्णांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. केरळात सोमवारी कोरोनाच्या 15 हजार 058 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. राज्यात आता कोरोनाबाधितांची संख्या वाढून 43 लाख 90 हजार 489 झाली आहे. तसेच कोरोनामुळे आणखी 99 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत केरळात कोरोनामुळे 22 हजार 650 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.