आरबीआयचे पतधोरण जाहीर -ईएमआय कमी होण्यासाठी कर्जदारांना प्रतीक्षा करावी लागणार
मुंबई / वृत्तसंस्था
भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी पतधोरण जाहीर केले असून त्यामध्ये व्याजदरात कोणताही बदल केलेला नाही. रिझर्व्ह बँकेच्या मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व व्याजदर ‘जैसे थे’ ठेवण्याची ही सलग सातवी खेप आहे. कोरोनास्थितीमुळे अर्थव्यवस्थेवर झालेल्या विपरित परिणामांमुळे रिझर्व्ह बँकेनेही सध्या सावध पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. एकंदर आरबीआयच्या हय़ा निर्णयामुळे बँक ग्राहकांना ईएमआयमधून कोणतीही सूट मिळणार नसल्याचे संकेत मिळत आहेत.
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आरबीआयने महत्त्वाच्या घटकांमध्ये म्हणजे रेपो दर, रिव्हर्स रेपो दरामध्ये कोणताही बदल केला नाही. त्यामुळे सध्या रेपो दर हा 4 टक्केच राहील तर रिव्हर्स रेपो दर हा 3.35 टक्के कायम राहील. तसेच मार्जिनल स्टॅन्डिंग फॅसिलिटी रेट हा 4.25 टक्के आणि बँक दर हा 4.25 टक्के असणार आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे सामान्य ग्राहकांचा ईएमआय कमी होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. साहजिकच कर्जदारांना ईएमआय कमी होण्यासाठी आता अजून काही काळाची वाट पहावी लागणार आहे.
भारतीय अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटातून सावरत असून लसीकरणाची गती वाढल्यानंतर अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार असल्याचा विश्वास आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी व्यक्त केला. कोरोनाचा मोठा आर्थिक फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसला असून त्यामुळे गेल्या 40 वर्षात पहिल्यांदाच जीडीपीने निच्चांक गाठला असून तो 2020-21 या वर्षासाठी -7.3 ने घसरला होता.
कोरोनाची पार्श्वभूमी लक्षात घेता आरबीआयने आपल्या सलग सातव्या आर्थिक धोरणात व्याजदरात कोणतेही बदल केले नाहीत. गेल्यावेळच्या म्हणजे जूनच्या प्रारंभी जाहीर केलेल्या आर्थिक धोरणातही आरबीआयने व्याजदरात कोणताही बदल केला नव्हता.
महागाई दराचा अंदाज वाढला
आरबीआयने आर्थिक वर्ष 2022 साठी महागाई अंदाज 5.1 टक्क्यावरून वाढवून 5.7 टक्के केला. 2022-23 च्या पहिल्या तिमाहीत महागाई दर 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. तसेच आरबीआयने या वषीचा विकासदर हा 9.5 टक्के राहील, असाही अंदाज व्यक्त केला आहे.