वेण्णालेकसह सर्वच पॉईंटवर पर्यटकांची गर्दी, वाहतूक कोंडींचा अनेकांना फटका
प्रतिनिधी/ महाबळेश्वर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला लागुन आलेल्या सलग सुट्टय़ांमुळे महाराष्ट्राचे नंदनवन व प्रसिध्द थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर हे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहे. दिवसभर विविध पॉईंटवर तर सध्याकाळी येथील बाजारपेठेत पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळत आहे. पर्यटकांच्या गर्दीमुळे महाबळेश्वरला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गर्दीमुळे महाबळेश्वरकडे येणारे सर्व रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी झालेली दिसत असुन या कोंडीत सापडलेले पर्यटक मात्र जाम वैतागलेले दिसत आहे. वाहतुकीची कोंडी दिसत असले तरी पोलीस मात्र रस्त्यांवर कुठेच दिसत नाहीत त्यामुळे पर्यटकातुन संताप व्यक्त केला जात आहे.
कोरोनाचे सर्व निर्बंध राज्य शासनाने मागे घेतले व मास्क मुक्ती देखिल जाहीर केली. त्याचप्रमाणे दहावीच्या परीक्षा संपल्या आहेत अशा वेळी डॉ. बाबासाहेब जयंतीला लागुनच चार सुट्टय़ा आल्यामुळे अनेकजण महाबळेश्वरच्या सहलीवर आले आहेत. पर्यटकांच्या गर्दीने महाबळेश्वर व पांचगणी ही दोन्ही पर्यटनस्थळे गजबजुन गेली आहेत. सकाळी सुर्योदय पाहण्यासाठी येथील विल्सन पॉईंटवर तर सध्याकाळी सुर्यास्ताचे विहंगम दृश्य पाहण्यासाठी येथील मुंबई पॉईंटवर पर्यटकांची एकच गर्दी उसळली आहे. दिवसभर विविध पॉईंटची सफर पर्यटक करीत असुन येथील अनोख्या व विलोभनिय निसर्गसौंदर्याचा मनसोक्त आनंद लुटत आहेत. येथील वेण्णालेकवर नौकाविहाराबरोबरच लालचुटूक स्ट्रॉबेरी, मलबेरी, राजबेरी, गाजर यांच्या जोडीला मक्याचे कणीस यावर पर्यटक यथेच्छ ताव मारत आहेत. याशिवाय येथे चौपाटीवर भेळपुरी, पाणीपुरी, रगडा पॅटीस, मक्कई पॅटीस खाण्यासाठीही पर्यटकांची पाऊले हातगाडीकडे वळत आहेत. याच ठिकाणी अनेक पर्यटक हे घोडसवारीचाही आंनद लुटत आहेत.
पर्यटकांच्या गर्दीमुळे महाबळेश्वरकडे येणारे सर्व रस्त्यांवर पर्यटकाच्या वाहनांची गर्दी झाल्याने वाहतुकीची कोंडी झाली आहे. वेण्णालेक ते माखरिया उद्यान या दोन कि मी अंतरावर वाहनांच्या दिवसभर रांगा लागल्याचे दिसत होते. त्याचप्रमाणे ऑर्थरसिट, मुंबई पॉईंट, केट्स पॉईंट या मार्गावरही वाहतुकीच्या कोंडीत पर्यटक मोठया संख्येने अडकलेले दिसत होते. सलग सुट्टयांमुळे येथे पर्यटकाची गर्दी होणार व येथे वाहतुकीची कोंडी होणार याची माहिती असुनही वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी कोणतेही नियोजन पोलिसांनी केले नसल्याचे दिसत आहे. या संदर्भात जिल्हा पोलीस अधिक्षक अजयकुमार बंन्सल यांनी लक्ष घालुन वाहतुक नियोजन करण्यासाठी स्वतंत्र पोलीस तैनात करावे अशी मागणी केली जात आहे.
उन्हाळी हंगाम सुरू झाला असला तरी वाहतुकीचे नियोजन पालीस विभागाने केले नसल्याचा फटका पर्यटकांना व स्थानिक नागरिकांना सोसावा लागत आहे. वाहतुकीचे नियोजन करण्याऐवजी पोलिसांची फौज नाक्या- नाक्यावर वाहन अडवुन त्यांची लुबाडणूक करताना दिसत आहेत हे कोठे तरी थांबले पाहिजे अशी मागणी गावातुन केली जात आहे.