मिशन कवचकुंडलमध्ये 4 लाख 20 हजार लसीकरणाचे उद्दिष्ट
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिह्यात मिशन कवचकुंडल हे अभियान यशस्वी करण्यासाठी सप्तपदीचे नियोजन करण्यात आले आहे. या अभियानात जिह्यातील 4 लाख 20 हजार जणांना लस टोचण्यात येणार असल्याचे उद्दिष्ठ राखण्यात आले आहे. यामध्ये चांगले काम करणाऱया प्राथमिक उपकेंद्र, आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय यांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. लसवंत गाव ही संकल्पनाही राबवण्यात येत आहे, असे जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
मिशन कवच कुंडल केंद्र व राज्य शासनाच्या सुचनेनुसार सातारा जिह्यातील कोव्हिड 19 अंतर्गत लसीकरण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे. या अंतर्गत सध्या सातारा जिह्यातील 18 वर्षावरील सर्व लोकांना कोव्हिड 19 चे मोफत लसीकरण सुरु करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने दि. 8 ते दि. 14 अखेर मिशन कवच कुंडल मोहिम राबवण्याचा निर्णय घेतला. पहिला डोस दिलेल्या लाभार्थीमध्ये होणारे मृत्यूचे प्रमाण हे 6.39 टक्के व दुसरा डोस दिलेल्या लाभार्थीमध्ये होणारे मृत्यूचे प्रमाण हे 0.99 टक्के आहे. शासनाने निर्धारित केल्यानुसार 18 वर्षावरील सर्व लाभार्थीचे 100 टक्के लसीकरण करण्याबाबत नियोजन केले आहे. त्यामध्ये शासनाने दि. 8 ते दि. 14 अखेर मिशन कवच कुंडल मोहिम आखली असून त्यानुसार सातारा जिह्यात मिशन कवच कुंडल मोहिम यशस्वी करण्यासाठी सप्तपदी निश्चित करण्यात आली आहे. याकरता जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण हे सनियंत्रण अधिकारी म्हणून नोडल अधिकारी व तालुकास्तरावर तहसिलदार हे नोडल अधिकारी म्हणून कामकाज पाहत आहेत.
सलग 75 तास कोव्हिड लसीकरण देशाच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षाचे औचित्य साधून सलग 75 तास लसीकरण सुरु करण्यात आले आहे. यामध्ये कस्तुरबा रुग्णालय सातारा, उपजिल्हा रुग्णालय कराड, ग्रामीण रुग्णालय पाटण या ठिकाणी सुरु आहे. विक्रमी उद्दिष्ठ 4 लाख 20 हजार लसीकरण आहे. यामध्ये प्रत्येक गाव, वाडीवस्तीवर लसीकरण करण्यात येणार आहे. कोव्हिड लसीकरण आपल्या दारी, ज्या लाभार्थींना लसीकरण केंद्रावर येवून लस घेणे शक्य नाही त्यांना जागेवर जावून लसीकरण करण्यात येत आहे. महिलांचे 100 टक्के लसीकरण करण्याचे ध्येय आहे. 100 टक्के पहिला व सर्व शिल्लक देय दुसरा डोस यामध्ये सातारा जिह्यातील 18 वर्षावरील लाभार्थींना पहिला डोस व देय दुसरा डोस देण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे.
जिह्यातील गाव, वाडीवस्ती, विटभट्टी, साखर कारखाने आदी ठिकाणी उपलब्ध शासकीय वाहनाद्वारे जावून प्रत्येक लाभार्थ्यांना कोव्हिड लसीकरण करण्यात येणार आहे. खाजगी संस्थांचा सक्रीय सहभाग असणार आहे. कोव्हिड लसीकरणाचे पूर्ण संरक्षित गाव ही संकल्पना सुरु करण्यात येत आहे. त्यामध्ये पालकमंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सरपंच तसेच सर्व अधिकारी व कर्मचाऱयांचा सहभाग घेवून प्रत्येक गाव कोव्हिड लसीकरण संरक्षित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
मिशन कवचकुंडल अभियान पुरस्कार योजना सुरु करण्यात आली असून त्यामध्ये उत्कृष्ट कामकाज करणारे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रे, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयांचा पुरस्कार देवून सन्मान करण्यात येणार आहे. या अभियानात सर्वोत्कृष्ट काम करणाऱया तीन पालिकांचा ही सन्मान करण्यात येणार आहे. तीन तालुक्यांचाही सन्मान करण्यात येणार आहे. तीन ग्रामपंचायतींचा यथोचित सन्मान करण्यात येणार आहे. जिह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कोव्हिडची लस उपलब्ध असून ती घ्यावी आणि स्वतःचे सरंक्षण करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी केले आहे.