हिंदुत्वाची तुलना केली ‘आयएसआयएस’शी : काँग्रेस हायकमांडवर भाजपचे टीकास्त्र
नवी दिल्ली : काँग्रेस नेते सलमान खुर्शिद यांच्या ‘सनराईज ओव्हर अयोध्या’ या पुस्तकावरुन गदारोळ सुरु आहे. खुर्शिद यांनी या पुस्तकात हिंदुत्वाची तुलना इसिस (आयएसआयएस) आणि बोको हराम या दहशतवादी संघटनांशी केली आहे. खुर्शिद यांचे हे पुस्तक बुधवारी प्रकाशित झाले असून अवघ्या चोवीस तासातच त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी विवेक गर्ग नामक वकिलाने दिल्ली पोलीस आयुक्तांकडे गुन्हा नोंदवण्याची विनंती केली आहे.
खुर्शिद यांच्यावर हिंदुत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. या पुस्तकाचे अनावरण काँगेस नेते पी. चिदंबरम आणि दिग्विजय सिंग यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले आहे.
पुस्तकातील वादग्रस्त लिखाणानंतर भाजपने सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधींवर निशाणा साधत त्यांच्या इशाऱयावरूनच खुर्शिद यांनी वादग्रस्त लेखन केल्याचा आरोप केला आहे. हे केवळ सलमान खुर्शिद किंवा काही काँग्रेस नेत्यांचे लेखन नसून ती काँग्रेस पक्षाची आजची विचारधारा आहे. देशाच्या एकात्मकतेत योगदान नसलेल्यांकडून देशातील बहुसंख्य लोकांच्या भावना चिरडणे, हेच यामागचे षड्यंत्र असल्याचा दावा भाजपचे प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केला आहे.
तसेच सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सांगण्यावरून हे वारंवार घडत असल्याचेही ते पुढे म्हणाले. तसेच सोनिया गांधी, जर हिंदूंचा आदर करत असतील तर त्यांना बाहेर पडून मौन सोडावे लागेल, असेही ते पुढे म्हणाले.
आक्षेपार्ह आशय
या पुस्तकाच्या द सॅफ्रॉन स्काय या प्रकरणात (पान क्रमांक 113) वर हिंदुत्वाची तुलना इस्लाम दहशतवादी गटांशी करण्यात आली आहे. साधूसंतांनी अंगिकारलेले हिंदुत्व आध्यात्मिक होते. पण आता ते बाजूला सारण्यात आले असून हिंदुत्वाचे आक्रमक स्वरुप समोर आले आहे.
तसेच सध्याचे हिंदुत्व राजकीय असून ते इस्लामी जेहादी संघटना आयएसआयएस किंवा बोको हराम यांच्याप्रमाणे कार्य करते अशी टिप्पणी करण्यात आली आहे, असा आरोप आहे.
भाजपचे शरसंधान
या पुस्तकात हिंदुत्वाची बदनामी करण्यात आली असून हे काँगेसचेच तत्वज्ञान आहे. काँग्रेसने सत्तेसाठी नेहमीच अल्पसंख्याकांच्या लांगूलचालनाचे धोरण स्वीकारले आहे. काँगेसचे नेतृत्व करणारे गांधी कुटुंब ‘टुकडे टुकडे गँग’चे समर्थक आहे. भारताची जातीच्या आधारावर विभागणी व्हावी अशी काँगेसची इच्छा आहे, असे अनेक आरोप मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी केले आहेत.
विनीत जिंदाल यांचीही तक्रार
दिल्लीतील एक वकील विनीत जिंदाल यांनीही हे पुस्तक आणि त्याचे लेखक सलमान खुर्शिद यांच्या विरोधात तक्रार सादर केली. हे पुस्तक समाजांमध्ये दुफळी माजविणारे आहे, असा आरोप तक्रारीत करण्यात आला. भारतीय दंड विधान (इंडियन पीनल कोड) अनुच्छेद 153, 153 अ, 298 आणि 505 (2) अंतर्गत पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.