उत्तर प्रदेशातील चित्रकूट येथे दिवाळीच्या दिवसात गाढवांचा बाजार भरतो. यंदाही तो भरलेला आहे. या बाजारात दरवषी साधारणतः दहा हजार गाढवांची खरेदी-विक्री होते. यंदाचे वैशिष्टय़ म्हणजे दोन गाढवांची नावे अनुक्रमे सलमान आणि शाहरुख अशी ठेवण्यात आली होती. त्यांना पाहण्याची उत्सुकता लोकांमध्ये दाटून आली होती. एका गाढवाची किंमत या बाजारात 2 ते 5 हजारपर्यंत असते. आतापर्यंत 3 कोटी रुपयांचा व्यापार झाल्याची माहिती देण्यात आली. दिवाळीच्या पहिल्या दिवशी मंदाकिनी नदीच्या तटावर या गाढव बाजाराची सुरुवात झाली. तो साधारण एक आठवडा चालतो.
पूर्वीच्या काळी राजे-महाराजे आणि इतर शासकांना सैन्यासाठी सामानाची वाहतूक करण्याकरिता मोठय़ा प्रमाणावर गाढवे लागत असत. तेव्हापासून हा बाजार भरतो. ही गेल्या 400 ते 500 वर्षांपूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. पूर्वी या बाजारात अफगाणिस्तानातूनही गाढवे येत असत. पण आता ती आयात बंद झाली आहे. आता उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, बिहार, झारखंड, महाराष्ट्र, उत्तराखंड, नेपाळ आदी प्रदेशांमधून गाढवे आणि ग्राहकही या बाजारात येतात. आजच्या आधुनिक वाहतुकीच्या काळातही गाढवांचे महत्त्व कमी झालेले नाही, हे या बाजारात होणाऱया ग्राहकांच्या गर्दीवरून दिसून येते.