माजी आमदार अमल महाडिक यांचा महाविकास आघाडी नेत्यांवर हल्लाबोल : राजकीय स्वार्थासाठी जनतेला वाऱयावर सोडणारे नेते असणे दुर्दैवी
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिह्यात वाढत्या कोरोनाबाधित रुग्ण आणि मृतांची संख्या रोखण्यात जिल्हा प्रशासन अपयशी ठरत आहे. राजकीय नेत्यांनी त्यांच्या सवडीप्रमाणे घेतलेल्या निर्णयामुळे आज जिह्याला कोरोनाच्या या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे, अशा शब्दात भाजपचे माजी आमदार अमल महाडिक यांनी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर या महाविकास आघाडीच्या नेत्यांची नावे न घेतला टीका केली आहे. निर्णय घेण्यात दिरंगाई करणाऱयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि संसर्ग रोखण्यासाठी यांचे पुढे काय नियोजन असणार आहे हे देखील जिल्ह्यातील जनतेला कळले पाहिजे, अशी मागणीही महाडिक यांनी केली आहे.
आपल्या फेसबुक पेजवर भूमिका मांडताना महाडिक यांनी स्वार्थासाठी जनतेला वाऱयावर सोडणारे राज्यकर्ते आज जिह्यात आहेत, हे खरेतर जिह्याचे दुर्दैव आहे. अशा स्थितीत आपण सर्वांनी हार न मानता प्रशासनाच्या मदतीला उतरले पाहिजे, असे आवाहनही केले आहे.
महाडिक यांनी आपली भावना मांडताना प्रश्नही उपस्थित केले आहेत, ते म्हणतात, जिह्यात लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका अशा सर्व ठिकाणी प्रतिनिधित्व करणाऱया महाविकास आघाडीने एकदाच याची जबाबदारी घेवून लोकांच्या जीवाशी सुरू असलेला खेळ थांबवावा. पहिली लाट आटोक्यात आल्यानंतर कोरोनाचा संसर्ग पुन्हा फैलवणार याची पूर्वकल्पना असतानाही कोणतीच पूर्वतयारी केली गेली नाही. व्हेंटिलेटर, रेमडेसिवीर, इंजेक्शन, बेड्स यांचे कसलेच नियोजन केले नाही. आज बेड्स, व्हेंटिलेटर यांची कमतरता भासत आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळा बाजार सुरू आहे. लसीकरण यंत्रणेत तर पूर्ण उदासीनता जाणवत आहे. भाजी मंडई, दुकाने येथे होणाऱया गर्दीचे कसलेच नियोजन नाही. त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अन्यथा परिस्थिती हाताबाहेर गेली तर कोल्हापूरला पुढे भयंकर परिस्थितीला तोंड द्यावे लागेल. सध्याच्या गंभीर स्थितीत आपण सर्वांनी हार न मानता प्रशासनाच्या मदतीला उतरले पाहिजे. आम्ही महाडिक परिवार व भाजपा-ताराराणी आघाडीमार्फत 125 बेड्सचे कोरोना केअर सेंटर उभारण्याचे नियोजन केले असून अजूनही काही उपाययोजना कराव्यात यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
कोरोनाविरोधातील लढ्यात प्रशासनाला साथ देवूया
कोरोनाविरुद्धचा हा लढा जिंकायचा असेल तर आता फक्त या राज्यकर्त्यांच्या भरवशावर राहून चालणार नाही. त्यामुळे जिह्यातील इतर मंडळीनीसुद्धा पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे. आपण सर्व नागरिकांनीदेखील स्वतःची व कुटुंबाची योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही महाडिक यांनी केले आहे.