जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दुर्गंधी : डासांच्या उत्पत्तीचे केंद्र बनण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेळगाव
तब्बल सव्वाकोटी रुपये खर्चून जिल्हाधिकारी कार्यालय आवारात भुयारी मार्गाची उभारणी करण्यात आली. मात्र, या मार्गाचा उपयोग करण्यास वकिलांबरोबर सर्वसामान्य जनतेनेही पाठ फिरविली आहे.
मध्यंतरी या भुयारी मार्गाचा वापर करावा यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. यामुळे पोलिसांनी या भुयारी मार्गाचा वापर करावा यासाठी मुख्य रस्त्यावरच बॅरिकेड्स उभारले होते. मात्र, वकिलांनी त्याला विरोध केल्यामुळे पुन्हा तो रस्ता खुला केला. त्यामुळे भुयारी मार्ग आता अडगळीचा ठरत आहे. पावसामुळे या भुयारी मार्गामध्ये गुडघाभर पाणी साचून आहे. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. या मार्गासाठी खर्च केलेले पैसे मात्र वाया गेल्याचे दिसून येत आहे.
वापर करण्याची मानसिकता नाही
मुख्य जिल्हासत्र न्यायालयाकडून जेएमएफसी न्यायालयात जाण्यासाठी भुयारी मार्गाची उभारणी करण्यात आली आहे. यासाठी सव्वाकोटीहून अधिक रुपये खर्च करण्यात आले. या मार्गामध्ये लोखंडी रॉड व टय़ुबलाईट चोरटय़ांनी यापूर्वीच चोरून नेले आहेत. या भुयारी मार्गाचा वापर करण्याची मानसिकता कोणाचीच नाही, असे दिसून येत आहे. यामुळे हा मार्ग केवळ शोभेची वस्तू बनली आहे.
आठ-दहा दिवसांपूर्वी सुरू झालेल्या जोरदार पावसाने या मार्गामध्ये पाणी साचून आहे. ते काढण्यासाठी आता महानगरपालिकेला पुन्हा विद्युत मोटार तसेच कर्मचाऱयांना जुंपावे लागणार आहे. या मार्गाचा काहीच उपयोग नाही. मात्र त्याच्या देखभालीसाठीच खर्च करावा लागत आहे.
जिल्हा प्रशासनाची तत्परता नडली
न्यायालयाच्या या मुख्य रस्त्यावर नेहमीच मोठी रहदारी असते. यामुळे या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड बनत आहे. या ठिकाणी अपघातही घडले आहेत. त्यामुळे वकिलांनी भुयारी मार्गाची मागणी करत आंदोलनेही केली. यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने मुख्य जिल्हासत्र न्यायालयाकडून जेएमएफसी न्यायालयाकडे वकिलांना जाण्यासाठी या भुयारी मार्गाची निर्मिती केली. यासाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात आला. मात्र या भुयारी मार्गाची उभारणी करताना वकिलांना विश्वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे हा भुयारी मार्ग कुचकामी ठरला आहे.
लक्ष कोण देणार?
या भुयारी मार्गात फरशी बसविण्यात आली आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी बाजूने गटारी काढून त्यावर लोखंडी झालर बसविण्यात आली आहे. अंधारात ये-जा करणाऱयांसाठी तब्बल 10 टय़ुब लाईट्स बसविण्यात आले होते. भुयारी मार्ग आकर्षक दिसावा यासाठी स्टीलचे किमती पाईपही बसविण्यात आले होते. मात्र, वकिलांनी भुयारी मार्गाचा उपयोग केलाच नाही. पावसाळय़ात येथे कंबरभर पाणी साचून राहत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली आहे.
या भुयारी मार्गातील टय़ुब लाईट्स चोरून नेल्या आहेत. बाजूला असलेल्या लोखंडी झालरही चोरटय़ांनी लांबविल्या आहेत. या भुयारात सर्वत्र कचऱयाचे साम्राज्य पसरलेले असते. स्टार, तंबाखू तसेच सिगारेटची पाकिटे पडली आहेत. एकूणच या भुयारी मार्गाचा दुरुपयोग होत आहे. यातच आता पावसाचे पाणी साचून राहत आहे.