लोकमान्यच्या नाशिकमधील विभागीय कार्यालयाचे उद्घाटन थाटात
प्रतिनिधी/ नाशिक
सहकार म्हणजे एकमेकांना मदत करत विकास साधणे होय. सहकाराचे हेच सूत्र लोकमान्यने आत्मसात केले असून सातत्याने प्रगतीचे नवीन टप्पे गाठले आहेत. याच पद्धतीने काम करून राज्यात संकटात सापडलेल्या सहकार क्षेत्राला संजीवनी देता येईल, असे मत अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री आणि पालकमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले. लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या नाशिकमधील विभागीय कार्यालयाच्या उद्घाटन सोहळय़ात ते बोलत होते. व्यासपीठावर लोकमान्यचे संस्थापक आणि दैनिक तरुण भारतचे सल्लागार संपादक किरण ठाकुर, संचालक पंढरी परब, संचालक गजानन धामणेकर, लोककल्प फौंडेशनचे किरण गावडे उपस्थित होते.
राज्यात सहकार क्षेत्राची परिस्थिती फारशी चांगली नाही. मोठा नावलौकिक असलेल्या नाशिकमधील सहकारी बँकांना दृष्ट लागल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यांच्याविषयी अनेक तक्रारी येत आहेत, असे निराशाजनक चित्र बनले असल्याचे भुजबळ यांनी सांगितले. नाशिकमधील आर्थिक व्यवहार करणाऱया अनेक संस्था, सोसायटय़ा अडचणीत आल्या आहेत. अनेक ठिकाणी व्यवहार तपासण्यासाठी प्रशासकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्यामुळे लोकांचा सहकारावर असलेला विश्वास कमी होताना दिसत आहे. मुळात सहकारामध्ये सगळय़ांना बरोबर घेऊन पुढे जात विकास साधायचा असतो. एकमेकांना मदत करायची असते, असे भुजबळ यांनी सांगितले.
बेळगाव सीमाप्रश्नावर बोलताना न्यायालयाकडून लवकरच समाधानकारक तोडगा निघेल, असे त्यांनी सांगितले. सीमाभागातील लोकांवर होणाऱया अन्यायाची राज्य सरकारला पूर्ण कल्पना आहे. त्यामुळेच हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकमान्य मल्टीस्टेट नव्हे नॅशनल सोसायटी होणार
लोकमान्यचा विस्तार महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि दिल्ली अशा राज्यात झालेला आहे. सोसायटीच्या कामाचे स्वरुप पाहता आता लवकरच मल्टीस्टेट नव्हे तर मल्टीनॅशनल सोसायटी ठरणार असल्याचे गौरवोद्गार भुजबळ यांनी काढले.
……म्हणून सांगतो किरण ठाकुर माणसे ओळखण्यात पटाईत
बेळगाव लढय़ाविषयी बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, त्यावेळी मी वेषांतर करून बेळगावात दाखल झालो होतो. वेषांतर करून मी पत्रकार ‘पांडे’ बनलो होतो. दाढी काढून टाकली होती. त्यामुळे मला कोणीच ओळखू शकले नाही. मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे यांना भेटायला गेलो तेव्हाही मला कोणीच ओळखले नाही. पुढे बेळगावात आलो, तेव्हा पण कोणीच ओळखले नाही. मात्र, किरण ठाकुर यांनी मला बरोबर ओळखले. माझ्याजवळ येऊन खांद्यावर हात ठेऊन हळूच कानात बोलले की, चला भुजबळ. मला आश्चर्यच वाटले. त्यानंतर ते मला पुढे घेऊन गेले. त्यामुळेच मी सांगतो की किरण ठाकुर माणसे ओळखण्यात पटाईत आहेत. लोकमान्य उभी करताना यांनी याच गुणांचा उपयोग करून माणसे जोडली आहेत. लोकमान्यच्या यशामागे त्यांचा हाच गुण असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना किरण ठाकुर यांनी सांगितले की, बेळगावचे लोक कायम भुजबळ यांना धन्यवाद देतात. कारण त्यांनी बेळगावकरांच्या वेदना समजून घेतल्या आहेत. त्यांच्यासाठी लढा दिला असून आजही देत आहेत. यावेळी त्यांनी बेळगाव लढय़ाच्या आठवणींना उजाळा दिला. त्याचप्रमाणे अजूनही मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती दिली.
सोबतच लोकमान्यने गेल्या 26 वर्षांमध्ये कोणाचीही फसवणूक केली नसून यापुढे कधीच करणार नाही, असे सांगत स्वच्छ कारभार हाच लोकमान्यचा पाया असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी लोकमान्यकडून राबविण्यात येणाऱया विविध सामाजिक उपक्रमांची माहिती करून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंढरी परब यांनी केले. यावेळी लोकमान्य आणि छगन भुजबळ यांचे असलेले नाते यावर त्यांनी प्रकाश टाकला. आभार नाशिकचे क्षेत्रीय प्रबंधक प्रकाश चितोडकर यांनी मानले. कार्यक्रमात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ठेवीदारांनी दिलेल्या ठेवींची पोहोच पावती प्रातिनिधिक स्वरुपात वितरित करण्यात आली.