केंद्रीय मंत्री अमित शाह यांचे प्रतिपादन – पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनाला केले संबोधित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी शनिवारी देशाच्या पहिल्या राष्ट्रीय सहकार संमेलनाला संबोधित केले आहे. सहकार क्षेत्र हे देशाच्या विकासातील महत्त्वाचा भाग असून हे क्षेत्र देशाच्या अर्थव्यवस्थेला 5 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचण्यासाठी मोठा हातभार उचलणार असल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
शाह यांनी यावेळी नवे सहकार धोरण आणण्याची घोषणा केली. सहकार आंदोलन आज अधिक प्रासंगिक आहे आणि सहकारी संस्था देशाच्या विकासात महत्त्वाचे योगदान देऊ शकता असे ते म्हणाले. 2021-22 चा अर्थसंकल्प मांडताना सरकारने सहकार मंत्रालयाच्या स्थापनेची घोषणा केली होती आणि अमित शाह यांना या नव्या मंत्रालयाचा अतिरिक्त प्रभार देण्यात आला होता.
सहकार मंत्रालयाचा पहिला मंत्री असल्याचा मला गर्व असून याकरता मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानतो. स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर सहकार चळवळीची सर्वाधिक गरज असताना पंतप्रधानांनी स्वतंत्र सहकार मंत्रालय निर्माण केल्याचे शाह यांनी म्हटले आहे.
सहकाराच्या क्षेत्राशी कोटय़वधी कुटुंबे जोडली गेली आहेत. सहकार गरीब आणि मागासांच्या विकासासाठीच आहे. सहकार हा भारताच्या संस्कारांमध्ये असून सर्वांना सोबत घेऊन चालायचे आहे. इफ्कोने गरीब क्रांतींना एक नवी दिशा देण्याचे काम केल्याचे उद्गार त्यांनी काढले आहेत.
देशातील सुमारे 91 टक्के गावांमध्ये एखादी तर सहकारी संस्था कार्यरत आहे. 91 टक्के गावांमध्ये सहकार चळवळ असणारा देश जगात अन्यत्र कुठेच नाही. सहकारी संस्थांना मजबूत करणे, त्यांचा विकास घडवून आणण्यासह आधुनिक स्वरुप देणे, स्पर्धात्मक युगात टिकून राहण्यास मदत करण्यासाठी सहकार मंत्रालय स्थापन करण्यात आल्याचे शाह म्हणाले.
सहकार चळवळीत कुठल्याही आपत्तीप्रसंगी मत करण्यासाठी पुढाकार घेतला जातो. पूर, चक्रीवादळ कुठल्याही संकटात मदतीसाठी हे लोक सरसावतात. सहकार क्षेत्राने अनेक उतार-चढाव पाहिले आहेत. ग्रामीण क्षेत्रात विकास पोहोचविण्याच्या उद्देशाने मोदींनी सहकार मंत्रालय निर्माण केले आहे. ग्रामीण क्षेत्रात प्रत्येक वंचितापर्यंत विकास पोहोचविण्याचे आव्हान पेलण्याची जबाबदारी सहकार मंत्रालयाची असल्याचे विधान त्यांनी केले आहे.
भारत सरकारचे सहकार मंत्रालय सर्व राज्यांसोबत सहकार्य करून चालणार आहे. कुठल्याही राज्याशी संघर्षासाठी याची स्थापना करण्यात आलेली नाही. प्रत्येक गावाला सहकाराशी जोडून, सहकाराद्वारे समृद्धीच्या मंत्रासोबत प्रत्येक गावाला समृद्ध करणे आणि त्यामाध्यमातून देशाला समृद्ध करणे हीच सहकाराची भूमिका असते. देशाच्या विकासात सहकाराचे योगदान आज देखील असल्याचे शाह यांनी नमूद पेले आहे.