गेल्या सुमारे दोनशे वर्षांमध्ये भांडवलशाही व्यवस्थेची अनेक रूपे पहायला मिळतात. औद्योगिक भांडवलशाही, वित्त भांडवलशाही, ज्ञान भांडवलशाही अशा अनेक रुपातून ही व्यवस्था आपले रूप बदलत आहे. पण त्याचा मूळ गाभा मात्र आहे तसाच आहे. सध्याच्या ज्ञान भांडवलशाहीमध्ये अनेक प्रकारची उत्पन्न विषमता दिसते. बुद्धिमत्तेच्या कुवतीवर आधारित लोक संघटित होत आहेत. त्यामुळे सामूहिक कृती क्षेत्र अथवा सहकाराचे स्वरुपदेखील बदलत आहे.
सहकाराला संस्कृतमध्ये समख्या म्हणतात. पूर्वीच्या तक्षशीला विद्यापीठामध्ये ज्या सहा विचारांच्या शाळा होत्या त्यामध्ये समख्या ही एक विचारधारा होती. त्याचे पुरस्कर्ते व विचारवंत कपिला मुनी होते. पतंजली, योग विचारधाराचे गुरू होते तसे समख्याची विचारधारा कपिलांनी सुरू केलेली होती. समूह का करावेत? समूहाची शिस्त कशी असावी? समूहाची वागणूक समाजहिताची कशी असावी, यासंबंधीची विचारप्रणाली सुमारे साडेतीन हजार वर्षापूर्वी मांडली होती. रामायण, महाभारत हे विद्यापीठातले शिकविले जाणारे विषय होते. रामायण हे आदर्श कुटुंब व्यवस्थेची, नात्यांचे आणि कर्तव्याची जाणीव करून देते तर महाभारत हे समाजाचे आणि राजकारणाचे धडे देणारे शास्त्र होते. स्कूल ऑफ ऍनालिसिसचे हेच मुख्य उद्देश होते. याला वसैसिका असे संस्कृतमध्ये म्हटले जाते. पण दुर्दैवाने त्याला धार्मिक रंग देऊन त्यातील भक्ती-पूजा व्यक्त केली जाते.
सहकार ही इतकी जुनी विचारधारा होती, ती विद्यापीठामधून शिकविली जात होती. हे भारतीय संस्कृतीच्या श्रीमंतीचे एक लक्षण आहे. आज सहकारी चळवळ ही नेत्यांची आणि पुढाऱयांची वळवळ म्हणून ओळखली जाते. म्हणूनच नेत्याच्या पराभवाबरोबर सहकाराचाही पराभव होताना दिसतो. लोकशाही व्यवस्थेमध्ये समूह, गट, समाज, धर्म, जात याकडे व्होट बँक म्हणून पाहिले जाते. कारण एक गठ्ठा मतदान होण्याची सुलभता निर्माण होते. त्यामुळे वाट्टेल ते करून समूह गटाचे राजकारण करून फेवरटिझम निर्माण करावयाचे आणि सत्तेत राहायचे असली कुपमंडूक भावना राज्यकर्त्यांची बनलेली आहे. वास्तवाचे विश्लेषण व त्याचे समीक्षण करण्याची क्षमता समाजात इतक्मया वर्षातही तयार होऊ शकली नाही. स्कूल ऑफ ऍनालिसिस व रिअलिझमचा हा उद्देश साडेतीन हजार वर्षांपासून शिकविला जात आहे. पण त्यातले वास्तव व उद्देश समाजाला कळले नाहीत, हे सुशिक्षित विचारवंतांचे अपयश म्हणावे लागेल. किंवा अशा विचाराला समाज व्यवहारात किंमत न देण्याची सामाजिक मनोवृत्ती निर्माण झालेली आहे. अशा मनोवृत्तीला शिक्षकांची गरज असते. शिक्षकांच्या वैचारिक बांधिलकीचा पुनर्विचार झाला पाहिजे.
ऍडमस्मिथचा श्रम-विभाजन सिद्धांत म्हणजे सहकाराचे प्रतीक आहे. शिवाय विकासाचे साधन आहे. सामूहिक कृती सिद्धांतामध्ये गट (लहान-मोठा) त्याचे फायदे, सदस्यत्वाची मानसिक लाभता आणि क्षमता (कामाची आणि त्यातील स्टॅमिनाची) टिकवून ठेवण्यासाठी समूह, गट (पर्यायाने सहकार) असे व का महत्त्वाचे आहेत? याचे विश्लेषण अनेक पाश्चिमात्य विचारवंतांनी मांडले आहेत. सहकारी चळवळीच्या अपयशाची कारणे शोधताना सामूहिक कृती सिद्धांताचा अभ्यास महत्त्वाचे दुवे निर्माण करतात. हे सहकाराच्या अभ्यासकांनी लक्षात घेतले पाहिजे. सहकाराच्या माध्यमातून विकासाचे जसे राजकारण झाले तसे सहकारातून राजकारणाचादेखील विकास झालेला आहे. नेतृत्वाचे अपयश प्रकर्षाने जाणवते. विचारवंतांनी आपल्या वैचारिक चौकटीतून बाहेर पडून सर्वसमावेशक दृष्टीकोन अंगिकारला पाहिजे.
ईज ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत युवकांना उद्योजकतेची संधी देण्यासाठी केंद्रीय पातळीवर सहकार मंत्रालय निर्माण केलेले आहे. आंतरराज्य सहकारी कायद्यांतर्गत संस्था नोंदणी करून सहकाराचा आरंभ हा बहुविध बनविण्याचा केंद्राचा दृष्टीकोन त्यातून व्यक्त होतो. कारण राज्ये साखर, दूध, पत, सूत, प्रक्रिया यातून सहकाराला बाहेर काढत नाहीत. नाविन्याचे काही निर्माण होत नाही. उलट उदारीकरणाच्या धोरणात्मक दृष्टीकोनामध्ये सहकाराचे खासगीकरण सुरू झाले आहे.
कालानुक्रमे समाजव्यवस्था व अर्थव्यवस्थेचे स्वरुप बदलत असल्यामुळे सहकारी संस्थांचे वेगवेगळे प्रारुप तयार होत आहेत. त्यातील को-प्रन्युअर्स नव्याने पुढे येत आहेत. त्यांची उद्दिष्टय़े, कार्यक्षेत्र, नामावली आणि लाभाची अर्थव्यवस्था वेगवेगळी आहे. 1970 च्या दरम्यान इटली देशामध्ये सोशल को-ऑपरेटिव्हज जन्माला आल्या. फ्रिलान्सर को-ऑपरेटिव्हज देखील जगभर मॉडेल म्हणून विस्तारत आहेत. मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्हज सुद्धा स्वतःचे अस्तित्व निर्माण करीत आहेत.
2001 मध्ये संयुक्त राष्ट्र संघाने काही मार्गदर्शक सूचना तयार केल्या. आमच्या सहकारसम्राटांनी ते कधी पाहिलेले नाही. जागतिक श्रमसंघाने सॉलिडॅटरी, इकॉनॉमीचे स्वरुप देऊन सहकार संघटित करण्याचा प्रयत्न केला. 2012 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे झाले. भारतात आणि विशेषतः गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्र राज्यांमध्ये याची किती दखल घेतली गेली? उलट सहकाराचा 4-5 हजार वर्षांचा वारसा सांगणाऱया भारताने सहकाराचा नवा दृष्टीकोन जन्माला घालायला हवा होता. तसे को-प्रन्युअर्स निर्माण न होणे हे आपल्या वैचारिक दारिद्रय़ाचे लक्षण म्हणावे लागेल.
ऍग्रीप्रन्युअर्स, टेक्नोप्रन्युअर्सप्रमाणे को-प्रन्युअर्स निर्माण होण्याची अथवा करण्याची वेळ आलेली आहे. नाविन्यातून लोकसंघटन, लोकसंवर्धन आणि लोकसेवा सामूहिक कृती व्यवस्थेतून निर्माण करता येते. त्यासाठी नवयुवकांमध्ये बुद्धिमत्ता, व्यवहारवाद आणि वैचारिक कृती कार्यक्रमाची सांगड घालून सुसंघटित अशी सहकारी व्यवस्था निर्माण करता येते. डिजिटल ऍग्रीकल्चरच्या धर्तीवर डिजिटल सहकार निर्माण होऊ शकते. सहकारी चळवळीबद्दलचे वेगळेपण लक्षात घेऊन कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय सहकार संघटनेने याचा पुरस्कार केलेला आहे. इतकेच नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये सामूहिक कृती अर्थव्यवस्था निर्माण होण्याचे संकेत मिळतात. विशेषतः सहकारी पतव्यवस्था नाबार्डपासून प्राथमिक सोसायटय़ांपर्यंत जोडता येतात. अशीच व्यवस्था सहकारी साखर कारखान्यांच्याबाबतीत शक्मय आहे. त्यासाठी संघटनात्मक तयारी करावी लागेल. रचनात्मक संघटन त्यानंतर होऊ शकते आणि शेवटी मानसशास्त्राrय संघटन हे सहकारामध्ये असतेच. त्याचे संघटन झाल्यास सांख्याकिय जोड निर्माण होऊ शकते. यादृष्टीने आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रयत्न झालेले आहेत. ते आता भारतास पोहोचणे आवश्यक आहे. यामुळे सहकाराचे जाळे निर्माण होईल. सर्व व्यवहार सुलभ करण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत. सामुहिक कृति अर्थव्यवस्था आणि त्यातील विविध कार्य, घटकांची ओळख करुन घेऊन त्यामध्ये सहसंबंध कसे प्रस्थापीत करता येतील ते पाहावे लागेल. थोडक्यात कोप्रन्युअरला, ऍग्रीप्रन्युअर आणि टेक्नोप्रन्युअर व्हावे लागेल. तरच सामुहिक कृति अर्थव्यवस्थेचे सांख्याक्रिय जोड निर्माण होऊ शकते. फक्त मानसिकता सहकारी प्रशासनाची आणि शासन व्यवस्थेची तयार झाली पाहिजे.
– डॉ. वसंतराव जुगळे