कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सातव्यांदा निर्णय
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
राज्यातील काही जिल्हय़ात कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढल्याने सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा 31 मार्चपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. निवडणुका पुढे ढकलण्याची ही सातवी वेळ आहे.
कोरोना संसर्गामुळे गेले वर्षभर सर्वच निवडणुका थांबल्या होत्या. कोरोना विषाणू आणि त्यामुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीमुळे राज्यावर आलेली नैसर्गिक आपत्ती विचारात घेता विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 18 मार्च 2020 च्या आदेशान्वये 17 जून 2020 पर्यंत, तसेच 17 जून 2020 च्या आदेशान्वये 16 सप्टेंबर 2020 पर्यंत, तसेच 28 सप्टेंबर 2020 च्या आदेशान्वये 31 डिसेंबर 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्य मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्यातील सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
पाच वर्षांच्या मुदती संपूनही देशातील कोणत्याच निवडणुका झाल्या नाहीत. ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमले होते. मात्र, कोरोनाचा प्रभाव कमी होताच ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. त्याचबरोबर काही राज्यांमध्ये विधान परिषद निवडणुकाही पार पडल्या. तसेच राज्यातील लोकप्रतिनिधी तसेच सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांनी सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याबाबत विनंती केली होती. या सर्वांचा विचार करून सहकारी संस्थांच्या निवडणुका तात्काळ सुरू करणे आवश्यक आहे. त्यामुळे 16 जानेवारी 2021 चे आदेश रद्द करून ज्या टप्प्यावर सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत, त्या टप्प्यापासून शासनाच्या कोविड-19 संदर्भातील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्याबाबतची कार्यवाही तात्काळ सुरू करण्याचे आदेश सहकार, पणन व वस्त्राsद्योग विभागाच्यावतीने काढण्यात आले होते. त्याप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्हय़ात जिल्हा सहकारी बँकेसह 775 सहकारी संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग वाढल्याने पुन्हा निवडणूक प्रक्रिया स्थगित करून 31 मार्च 2021 पर्यंत पुढे ढकलल्या आहेत.