देशाचे गृहमंत्री आणि पहिले सहकार मंत्री अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा चांगलाच गाजत आहे. प्रवरेच्या मैदानावर बोलताना शहा यांनी आपण सहकार तोडायला नव्हे तर जोडायला आलो आहोत हे जाहीर केले. त्याचवेळी मला सल्ला देण्यापेक्षा शरद पवार आणि राज्यसरकारने स्वतःच्या कारभाराकडे पहावे, असा टोला लगावला. केंद्र सरकारची आणि भाजप नेत्यांची महाराष्ट्रातील सर्व साखर कारखानदारीला मदत मिळावी अशी तर राज्यातील सत्ताधाऱयांची केवळ स्वपक्षीय कारखानदारांना मदतीची भावना आहे, अशी टीका केली. पुण्यात वैकुंठभाई मेहता संस्थेत बोलताना त्यांनी सरकारबाबत आगामी पंचवीस वर्षाचे धोरण लवकरच ठरवले जाईल. आता यापुढे समित्या नेमणे वगैरे चालणार नाही, सरकार स्वतःच तज्ञांशी बोलेल आणि त्याप्रमाणे धोरण आखेल असे स्पष्ट केले. सोसायटय़ांचे संगणकीकरण जिल्हा बँक, राज्य बँक आणि नाबार्डशी जोडून कृषीला वित्तपुरवठय़ाचे धोरण असल्याचे स्पष्ट केले. मल्टीस्टेट संस्थांमधील त्रुटी दूर करण्याचे सूतोवाचही शहा यांनी केले आहे. देशाला सहकाराचे एक धोरण आवश्यक होते. त्याचबरोबर सर्वसामान्यांना वेळेला उपयोगी पडणाऱया सोसायटय़ा आणि मल्टीस्टेट संस्थासुद्धा राष्ट्रीयीकृत बँकांच्यापेक्षा अधिक गतीने सरकारला अपेक्षित असणारे उद्दिष्ट सफल करत आले आहे, याचा विचार या धोरणांमध्ये होण्याची नितांत आवश्यकता आहे. या कार्यक्रमात अमित शहा यांनी सहकार विद्यापीठाचा विचार बोलून दाखवला शिवाय शेतकऱयांना उत्पादन आणि विपणन साखळीत जोडून निर्यात यंत्रणा कार्यान्वीत करण्याबाबतही सरकारचा इरादा बोलून दाखवला आहे, त्याचे स्वागत झाले पाहिजे. महाराष्ट्रात आल्यानंतर अमित शहा सहकाराबाबत कोणत्या घोषणा करतात याबाबत सर्वांचीच उत्सुकता होती. त्यातील राजकीय घोषणांना जितके प्रसिद्धीचे वलय प्राप्त होते तितके सकारात्मक किंवा रचनात्मक कार्याला होत नाही. सहकारातील त्रुटी दूर होण्याची आवश्यकता आहेच मात्र सत्तेच्या राजकारण्याच्या सोयीसाठी सर्वांना सांभाळून घेण्याच्या प्रयत्नात सहकाराचा तोल ढासळतो आणि त्यामुळे चांगल्या चांगल्या संस्था लयाला जातात. मग आपले लयाला चाललेले साम्राज्य वाचवण्यासाठी कधीकाळीचे सहकार सम्राट राजकीय दोरखंडावर कोलांटय़ा उडय़ा मारून कसरतीचे खेळ खेळू लागतात. कधी मायबाप सरकारला खुश कर तर कधी जनताजनार्दनाला आकर्षित कर अशा कारभारात त्यांच्या सहकाराचा तोल अधिकच ढळतो आणि व्यक्ती आणि समाजाने केलेल्या सहकार मंदिराची वाटचाल खाजगीकरणाच्या दिशेने होते. राज्यात सहकारावर पहिल्यांदा बोलले असले तरी अमित शहा यांना यातील ही मेख माहित नाही अशातला भाग नाही. त्यामुळे यापुढे केंद्र सरकारकडून कोणाला आणि कशी मदत मिळते यावरून सरकारचे धोरण स्पष्ट होईलच. मात्र खऱया अर्थाने शहा यांचा दौरा गाजतो आहे तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तीन पक्षांनी राजीनामा देऊन भाजपशी दोन हात करण्याचे आव्हान दिल्याबद्दल. उद्धव ठाकरे यांनी सत्तेसाठी भाजपची साथ सोडली, मुख्यमंत्रीपद शिवसेनेला देण्याबाबत आपण कोणतीही चर्चा केलेली नाही, याउलट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली गेली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आपण भाषणात देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार असे जाहीर करत होतो, तेव्हा उद्धव ठाकरे स्टेजवरच होते, तेव्हाही त्यांनी आक्षेप घेतला नाही, निवडणूक निकालानंतर त्यांनी गद्दारी केली असा एएनआयशी बोलताना केलेल्या आरोपाचा पुनरुच्चार केला आहे. पूर्वी यावर उद्धव ठाकरे यांनी, पत्रकार परिषदेत शहा यांनी जाहीर केलेले 50-50 टक्के सत्तेचे वाटप म्हणजे काय? असा प्रश्न केला होता, तोच खुलासा शिवसेनेकडून संजय राऊत आणि अरविंद सावंत या खासदारांनी केला आहे. आम्हाला राजीनामा मागणार यांनी आपल्या 105 आमदारांचा राजीनामा देऊन निवडणूक लढवून पुन्हा एवढय़ा संख्येने निवडून येऊन दाखवावे असे प्रति आव्हान राऊत यांनी दिले. आता यात कोण कोणाशी गद्दारी केली हा प्रश्न कायम अनुत्तरीत राहणार आहे. महाराष्ट्रात आगामी काळात होणाऱया महापालिका आणि इतर निवडणुकीच्या निमित्ताने हा वाद पुन्हा उफाळला आहे. अमित शहा यांचा महाराष्ट्रातील दौरा या निवडणुकांना डोळय़ासमोर ठेवूनच असल्याने त्यांनी केलेले राजकीय भाषणसुद्धा राज्यातील सत्ताधाऱयांना अत्यंत गांभीर्याने घ्यावे लागणार आहे. राज्यातील सरकारची तीन चाकी गाडी पंक्चर झाली असून ती तशीच दामटण्याच्या नादात प्रदूषण वाढत आहे, मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने वचन मोडले, हिंदुत्व सोडले आणि दोन पिढय़ा वाद घातला त्यांच्या मांडीवर जाऊन बसले हिंमत असेल तर त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि तीन पक्षांनी एकत्र लढून भाजपशी दोन हात करावेत, आपली तयारी आहे असे आव्हान त्यांनी देऊ केले. अमित शहा आणि भाजप यांचे सहकारातील टार्गेट वेगळे आणि सरकारातील टार्गेट वेगळे आहे हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्टपणे दिसून आले. सहकारात आपल्याला पवारांच्या निर्विवाद वर्चस्वाला आव्हान द्यायचे आहे आणि सरकारला आव्हान देताना शिवसेनेला टीकेच्या केंद्रस्थानी ठेवायचे आहे हे पक्के ठरवून अमित शहा बोलत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याला एक धार आलेली आहे. तीन पक्षांनी एकत्र येऊन आमच्या विरोधात करावे असे वाचावे यापूर्वी फडणवीस किंवा चंद्रकांत दादा पाटील यांनी केले नव्हते असे नाही. उलट असे आव्हान भाजपातील गावोगावच्या कार्यकर्त्यांपासून त्यांच्या हितचिंतकापर्यंत सर्वच देत असतात. मात्र आजपर्यंत जो हेतू भाजपला साध्य करता आला नाही तो शहा यांच्या वक्तव्याने साधता आला. महाराष्ट्रात खऱया अर्थाने आता सहकार आणि सरकारातील राजकीय चढाओढ गतीने सुरू होईल. मोदी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत गुंतले असताना अमित शहा महाराष्ट्रात डोकावून जात आहेत. त्यामुळे भविष्यात राजकीय क्षेत्रात आणि सहकार क्षेत्रातही खळबळजनक घटना घडू लागल्या तर त्याबद्दल आश्चर्य मानता येणार नाही.
Previous Articleऍमेझॉनने गाठला 10 लाख विक्रेत्यांचा टप्पा
Next Article वन प्लसने गाठला एक कोटी विक्रीचा टप्पा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.