अध्याय अकरावा
श्रीकृष्ण आणि अर्जुन हे नर नारायणाचा अवतार होते म्हणून श्रीकृष्णाने अर्जुनाला गुह्यज्ञान सांगितले पण ते भगवंतांनी उद्धवालाही सांगितले हे विशेष आहे. यावरून उद्धव हा श्रीकृष्णाचा अर्जुनाहूनही लाडका भक्त आहे असा निष्कर्ष निघतो. विशेष म्हणजे कृष्णावतारातले कार्य संपवून श्रीकृष्ण निजधामाला जायच्या तयारीत होते पण ते काही काळ पुढे ढकलून उद्धवाला उपदेश करायचे कार्य त्यांनी हातात घेतले होते. त्याअर्थी श्रीकृष्ण उद्धवाच्या प्रेमात गुंतला होता यात शंका नाही. म्हणून असे म्हणता येईल की, ज्याच्यासाठी स्वानंदघन नारायण स्वतः दयार्द झाला त्या उद्धवाचे पुण्य फारच निर्मळ होय. योगयागादि साधनांनीही जो मिळावयाचा नाही, तो उद्धवाच्या शब्दावरून गुह्य गोष्टी सांगू लागला. भगवंतांनी स्वतःच्याच कुळाचा नाश करायचे ठरवले होते पण तेच भक्तकैवारी ज्ञानकल्लोळ आणि अतिशय प्रेमळ भगवंत श्रीकृष्ण उद्धवावर प्रसन्न झाले. उद्धवाचे महत्त्व एवढे आहे की, त्याचे एखाद्याने नाव जरी घेतले तरी श्रीकृष्ण त्याला संसारदुःखापासून मुक्त करतात. श्रीकृष्णाचे उद्धवावर एवढे प्रेम आहे की त्याचे स्मरण केले तरीसुद्धा त्याला भगवान तारतात. अर्थात प्रत्येक भक्ताच्या बाबतीत हे घडत असतेच. भगवंत वारंवार मुक्त पुरुषांचा, त्यांच्या लक्षणांचा उल्लेख करतात कारण एकदा भक्ताने ती लक्षणे लक्षात घेतली की त्या मुक्त पुरुषांप्रमाणे त्यालाही मुक्ती मिळते.
कृष्ण उद्धवाला म्हणाले, मी आपले अत्यंत गुह्य असे मुक्तलक्षणांचे रहस्य तुला निवेदन करत आहे. मुक्त पुरुष शारीरिक क्रिया उदाहरणार्थ बसणे, जेवणे, निजणे, पाहणे, स्पर्श करणे, वास घेणे, फिरणे, स्नान करणे ही कृत्ये कशी करतात हे जाणून घेण्याची तुला मोठी उत्सुकता आहे असे म्हणत होतास ना, मग ते सविस्तर सांगतो ऐक. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे मी कर्ता नाही या भूमिकेवर तो ठाम असल्याने तो करत असलेल्या कोणत्याही कर्माचा त्याला अभिमान वाटत नसतो. त्यामुळे मुक्त पुरुषाने केलेले कर्म त्याला बाधत नाही. प्रत्येक गोष्टीत ईश्वराचे अधि÷ान त्याला स्पष्ट दिसत असल्याने त्याचे सर्व लक्ष त्यावरच खिळलेले असते. त्यामुळे अभिमान त्याच्या जवळपासही फिरकू शकत नाही. ईश्वरी अधि÷ानाशी तो इतका एकरूप झालेला असतो की त्याला इतरांची उपस्थिती जाणवतच नसते. त्यामुळे त्याचा एकांत कधी भंग पावत नाही. हेच मुक्ताचे ‘सहजासन’ होय. या आसनाचे महत्त्व असे आहे की, या आसनात असलेल्या मुक्त पुरुषाच्या दृष्टीने समाधी लावणे आणि उतरणे या दोन्ही अवस्था अस्तित्वात नसतात. हेच मुक्ताचे चालते बोलते आसन होय. सहजासनावर बसले असता जे समाधान असते, तेच हिंडता फिरतानाही असते. उठलो किंवा बसलो याचेही स्मरण रहात नाही. चालण्याचेही भान नसते. पायांनी भराभर चालत असले, तरी मी चालतो आहे असे त्याच्या बुद्धीला स्मरत नाही. चालतानासुद्धा त्याची समाधी मोडत नाही. मुक्ताची प्रतिक्षणसिद्धि अशी असते. तो स्वतःहून काहीच करत नसल्याने तो जरी काही हालचाली करत असला तरी त्या फक्त दिसण्यापुरत्या असतात. मुळात मुक्त आपल्या ठिकाणावरून मनाने हालत नाही. कुंभाराच्या चाकावर बसलेली माशी जाग्यावरून न हालताच त्या चाकाबरोबर फिरत असते. त्याप्रमाणेच मुक्ताचे गमन देहाच्या गमनाबरोबर भासत असते. कारण देह हा प्रारब्धाप्रमाणे हिंडत असतो पण मुक्ताची आत्मस्वरूपातील बैठक काही हालत नाही. असे न हालताच जे हालणे तेच मुक्ताचे ‘गमन’ होय. आता आत्मस्वरूपात बुडी देऊन तो ‘स्नान’ कसे करतो ते ऐक. तो पाण्याने स्नान करतो परंतु पाण्याला स्पर्शही करीत नाही. चित्स्वरूपात त्याचे मन जे गुंतलेले असते ते तेथून निघतच नाही. त्यातच आत्मस्वरूपामध्येच भिजलेला असल्यामुळे त्याला परमपवित्रता आलेली असते. त्यामुळे तीर्थेच त्याच्या चरणाचे तीर्थ मागत असतात, इतके मुक्ताचे स्नान पवित्र असते. तो पाण्यातही चित्स्वरूपच पहात असतो इतर लोक त्याने स्नान केले असे म्हणतात पण तो निजस्वरूपामध्येच बुडी देऊन बसलेला असतो.