पाणीटंचाईची समस्या कायम : नागरिकांची गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
सहनशील बेळगावकरांची प्रशासन, महानगरपालिका व एलऍण्डटी कंपनी जणू परीक्षाच पहात आहे. गेल्या महिनाभरापासून शहराला पाणीसाठा असूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अतिवृष्टीने अनेक समस्या उद्भवतात, परंतु जलाशये मात्र तुडुंब भरतात. सर्व समस्यांच्या यादीत पाणीसाठा पुरेसा असणे ही एक दिलासादायक बाब आहे. परंतु केवळ समन्वयाच्या अभावापोटी मनपा आणि एलऍण्डटीने सध्या बेळगावकरांना वेठीस धरले आहे.
शहर स्मार्ट करण्याच्या घाईपोटी नागरिकांची गैरसोय करणे हे जणू प्रशासनाचे ब्रिदवाक्मय झाले आहे. स्मार्ट सिटीच्या कामांतर्गत एकदा गॅस पाईपलाईन घालणे, पुन्हा केबल वायर घालणे, हेस्कॉमच्या विद्युत वाहिन्यांची जोडणी आणि रस्ते करणे अशा प्रत्येक वेळी रस्ते खोदले जातात. एकाचवेळी ही सर्व कामे करून कायमचा पक्का रस्ता करण्याची मागणी बेळगावकर वर्षानुवर्षे करत आहेत. परंतु ते केवळ दिवास्वप्न राहिले आहे.
पाणीटंचाईचे संकट तीव्र होत असूनही बेळगावकर अद्यापही संकटाचा सामना करत शांत बसले आहेत. बेळगावकरांची हीच सहनशीलता केवळ प्रशासन नव्हे तर सर्वच सरकारी यंत्रणेच्या पथ्यावर पडली आहे. एक-दोन संघटना पाण्यासाठी आंदोलन करतात, निवेदन देतात आणि पुन्हा सर्व काही जैसे थे होते. आपल्या हक्कांसाठी लढा देण्याचे किंबहुना आपल्या मूलभूत सार्वजनिक गरजांची पूर्तता व्हावी यासाठी संघर्ष करणे आपण विसरलो आहोत की काय, अशी शंका येत आहे.
महिनाभरापासून शहरात ठिकठिकाणी पाणीटंचाई तीव्र झाली आहे. अजूनही उन्हाळा तसा तीव्र झाला नाही. परंतु जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ापासूनच शहरात टँकर फिरू लागले आहेत. एकीकडे पाण्याचे बिल द्यावयाचे आणि दुसरीकडे टँकरसाठी भरमसाट पैसे मोजायचे, हे बेळगावकरांचे दुर्दैव आहे. महानगरपालिका व एलऍण्डटी यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. मुख्य म्हणजे एलऍण्डटीला पाणीपुरवठय़ाचे नियोजन करून हा प्रश्न हाताळण्यात अपयश आले आहे.
किमान एक तास तरी पाणी सोडा
सर्वसामान्य जनतेला सदैव पाण्याची गरज भासते. 24 तास पाणीपुरवठा बेळगावकरांच्या नशिबात अद्याप तरी दिसत नाही. परंतु किमान एक तास तरी पाणी सोडावे, अशी बेळगावकरांची मागणी आहे. ते शक्मय नसेल तर अर्धा तास पाणीपुरवठा करावा. परंतु पाणी पुरेशा दाबाने सोडावे, अशी मागणी होत आहे. आता नागरिकांनी अशीच सहनशीलता दाखविल्यास महानगरपालिका व एलऍण्डटी यांच्या वादात बेळगावकरांच्या तोंडचे पाणी मात्र पळणार आहे, यात शंका नाही.
पाणीपुरवठय़ात आज व्यत्यय
संपूर्ण शहरातील पाणीटंचाईचे संकट तीव्र झाले असताना पुन्हा गुरुवारी शहराच्या पाणीपुरवठय़ामध्ये व्यत्यय येणार असल्याचे पत्रक केयुआयडीएफसीच्या व्यवस्थापकांच्या सहीसह प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
हिंडलगा पंपिंग हाऊस येथील दोन स्टार्टर पॅनल जळाल्याने गुरुवारी पाणीपुरवठा होणार नसल्याचे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांनी याची नोंद घेऊन एलऍण्डटी कंपनीला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
पाणीसमस्येने शहरातील जनता त्रस्त : जिल्हाधिकाऱयांना निवेदन देऊन व्यक्त केला तीव्र संताप
पाण्यासाठी संपूर्ण शहरालाच वणवण करावे लागत आहे. स्मार्ट सिटीमध्ये बेळगावचा समावेश झाल्यानंतर अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. स्मार्ट सिटीच नको बाबा म्हणण्याची वेळ सर्वसामान्य जनतेवर आली आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून सह्याद्रीनगर, पोलीस कॉलनी, सारथीनगर, आश्रय कॉलनी, विद्यानगर या परिसरात पाणीच सोडण्यात आले नाही. त्यामुळे आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न या नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांकडे केला आहे.
या शहरावर ना अधिकाऱयांचे लक्ष आहे ना लोकप्रतिनिधींचे! सर्वसामान्य जनता पाण्यासाठी वणवण भटकत आहे. पाणीपुरवठा मंडळातील कर्मचाऱयांच्या अंतर्गत वादामुळे सर्वसामान्य जनता भरडली जात आहे. स्थानिक कंत्राटदारांना कंत्राट देण्याऐवजी विदेशी कंपन्यांना कंत्राट देऊन संपूर्ण बेळगावचीच वाताहत लावल्याचा आरोप करण्यात येत आहे. पाणी पाणी म्हणून सारे जण महानगरपालिकेच्या नावाने शंख वाजवू लागले आहेत.
पाणीपुरवठा मंडळातील अधिकाऱयांना फोन केला असता ते फोन उचलण्यास तयार नाहीत. काही कंपन्यांना कंत्राट देऊन सर्वसामान्य जनतेला अडचणीत टाकले आहे. एकतर शहरामध्ये कूपनलिका नाहीत, विहिरी नाहीत. त्यामुळे पाणी आणायचे कोठून, असा प्रश्न पडला आहे. गेल्या 50 वर्षांमध्ये पाण्याची कमतरता कोणालाच भासली नव्हती. काही वेळा टंचाई निर्माण झाली तरी लवकरच त्यावर तोडगा काढला जात होता. मात्र आता वारंवार पाण्याच्या समस्येने आम्ही वैतागलो आहे, असे संतापजनक उद्गार नागरिकांनी जिल्हाधिकाऱयांसमोर
काढले.
शहरातील जनतेला मूलभूत सुविधा देता येत नसतील तर अधिकाऱयांनी राजीनामा देऊन घरी बसावे. लोकप्रतिनिधींनी राजीनामा द्यावा, जेणेकरून दुसरे अधिकारी आणि लोकप्रतिनिधी काम करायला येतील. अशाप्रकारे जनतेची हेळसांड करत असाल तर तुमचा काय उपयोग? असा प्रश्न उपस्थित केला. केवळ याच परिसराला पाणीसमस्या नाही तर शहरातील अनेक भागांमध्ये पाणीसमस्या भेडसावत आहे. आता जिल्हाधिकाऱयांनीच यासाठी पाऊल उचलावे, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी वीणा विजापुरे, आय. सी. पट्टणशेट्टी, जी. के. कुलकर्णी, एस. पी. पाटील, एस. एस. गच्ची, शिवाजी बोगार यांच्यासह नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.