कोलवाळ तुरुंग कैदी पलायन प्रकरण
प्रतिनिधी / पणजी
कोलवाळ तुरुंगातून कैदी पलायन प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेऊन एक सहाय्यक जेलर व दोन जेल गार्डना निलंबीत केल्याचा आदेश काल गुरुवारी जारी करण्यात आला आहे. निलंबीत करण्यात आलेल्यांमध्ये सहाय्यक जेलर परेश गावस देसाई, जेल गार्ड उल्हास तळेकर व अनंत गावस यांचा समावेश आहे.
काणकोण येथे एका ब्रिटिश महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या 32 वर्षीय रामचंद्र चन्नाड यल्लाप्पा याने मंगळवारी कोलवाळ तुरुंगातून पलायन केले होते. पलयान केले त्यावेळी डय़ुटीवर असलेल्या तुरुंग कर्मचाऱयांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई केली आहे. याबाबत सखोल चौकशी करण्यात येणार असल्याचेही अधिकाऱयांनी सांगितले.
एक महिन्याच्याकाळातच दोन कैद्यांनी तुरुंगातून पलायन केल्याने तुरुंगातील सुरक्षेसंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून सरकारने त्या घटनांची गंभीरपणे दखल घेतली आहे. 25 ऑगस्ट रोजी अमलीपदार्थ प्रकरणातील कैदी हेमराज भारद्वाज याने तुरुंगातून पलायन केले होते, तर मंगळवारी 22 सप्टेंबर रोजी यल्लापा याने तुरुंगातून पलायन केले. तुरुंगातून वारंवार कैदी पलायन करीत असल्याने तुरुंगातील सुरक्षेतेबाबत संशय निर्माण होऊ लागला आहे.
तुरुंगातील सुरक्षेचे काम आयआरबी पोलीस, जेल गार्ड तसेच गोवा मनुष्यबळ महामंडळाचे कर्मचारी काम पाहत असतात. इतके असतानाही तुरुंगातून कैदी पळण्याचे प्रकार वाढू लागल्याने सरकारने तिन्ही खात्यातील वरिष्ठ अधिकाऱयांची तातडीची बैठक बोलावून त्वरित तुरुंगाची पहाणी केली व कैदी पलायनास जबाबदार असलेल्या सहाय्यक जेलर व दोन जेल गार्डना तत्काळ निलंबीत करून त्यांची सखोल चौकशी सुरु केली आहे.
केवळ तुरुंग रक्षकांनाच शिक्षा का
तुरुंगातून एखाद्या कैद्याने पलायन केले की त्याला केवळ जेल गार्डनाच का जबाबदार धरले जाते, असा प्रश्न एक जेल गार्डने उपस्थित केला आहे. तुरुंगात आत जाण्यासाठी तीन प्रवेशद्वारे आहेत. पहिल्या प्रवेशद्वारावर आयआरबेचे पोलीस तैनात असतात, दुसऱया प्रवेशद्वारावर गोवा मनुष्यबळ महामंडळाचे कर्मचारी काम पाहत असतात तर तिसऱया प्रवेशद्वारावर जेल गार्ड असतात. या तिन्ही प्रवेशद्वारांवर सुरुक्षाव्यवस्था तैनात असतानाही कैदी पलायन करीत असले तर तिन्ही प्रवेशद्वारावर डय़ुटी बजावत असलेले तितकेच जबाबदार असतात. असे असताना प्रत्येकवेळी केवळ जेल गार्डनाच बळीचे बकरे करून इतर सर्वांना मोकळीक दिली जाते. या साऱया प्रकाराचा विपरित परिणाम होऊनच सुरक्षव्यवस्थेच्या कामात हलगर्जीपणा होतो आणि त्याची शिक्षा केवळ जेल गार्डनाच भोगावी लागते.