अध्याय सातवा
यादव कुळातील ज्ये÷ राजा, नहूशपुत्र यदूमहाराज हे ब्राह्मणभक्त, सत्त्वयुक्त, बुद्धिमंत आणि श्रद्धाळू होते. भगवद्भाग्याने त्यांची अवधुतांशी गाठ पडली. अवधूत म्हणजे मूर्तिमंत परमशांतीचे स्वरूप होते त्यांच्या तेजाने प्रभावित होऊन यदुमहाराजांनी अवधुताना त्यांच्या परमशांतीचे रहस्य विचारले. त्यावर क्षीरसागराप्रमाणे घनगंभीर आवाजात कृपेचा मेघ गर्जल्याप्रमाणे अवधूत म्हणाले, तू माझ्या निजानंदाचे कारण विचारतो आहेस तर ऐक, राजा, गुरुविण आत्मप्राप्ती कधीही घडत नाही. म्हणून मी पुष्कळ गुरु केले. अशा पद्धतीने यदुमहाराज आणि अवधूत यांच्यातील संवाद सुरू झाला. अवधुतानी बोलल्याप्रमाणे पुष्कळ गुरु केले आहेत. ज्याच्यात जो सद्गुण दिसला तो अवधुतानी आत्मसात केला. पुढील गुरुंची माहिती देताना अवधूत यदुराजाला म्हणाले, ‘देहाला जन्म मृत्यू आहे, आत्मा नित्य अविनाशी आहे, ही श्रद्धा दृढ करण्यासाठी मी हिमांशू म्हणजे चंद्राला गुरु केले. चंद्राच्या कला शुक्ल पक्षात वाढतात, कृष्ण पक्षात कमी होतात, याने चंद्राला काहीच फरक पडत नाही. योग्याने हे लक्षात घेऊन तसे रहावे. शुक्ल कृष्ण पक्षात चंद्रकळांच्या संख्येत वाढ आणि कमी होत असते पण त्याचे चंद्राला काहीच वाटत नाही. योग्यानेही हे ओळखून असावे की, जन्ममृत्यू षड्विकार हे देहालाच लागू असतात तर आत्मा अविनाशी, निर्विकार, अनंत, अपार, आत्मस्वरूपात मग्न असतो. आणखी सांगायचे म्हणजे मातीचा घट नाशवंत असतो. त्यामधील पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब दिसते. घटात चंद्र दिसतो आणि घट फुटल्यावर घाटातील चंद्र दिसेनासा होतो. असे जरी असले तरी चंद्र काही घटाबरोबर जन्म घेत नाही की, घट फुटल्यावर मृत्यू पावत नाही. तो नेहमीच आपल्या सहजस्थितीत असतो. त्याप्रमाणे योग्याने देहाच्या सोबतीने न राहता निजरूपात अखंडपणे परिपूर्ण रहावे. असे राहता आले की, योगी काळाच्या पलीकडे जाऊन कालातीत होतो. परिणामी योग्याला काळावर विजय मिळवता येतो. कारण जन्म मृत्यू हे देहासाठी आहेत. आत्मा अविनाशी, निर्विकार, अनंत आणि अपार असाच आहे. त्यामुळे तो देहाबरोबर जन्मत नाही की देहाबरोबर मरतही नाही. तो चंद्राप्रमाणे अखंड स्वरूपाने सदैव परिपूर्ण असतो. काळाची सत्ता देहावर चालते. आत्मस्वरूपाला ती स्पर्शही करू शकत नसल्याने एवढा बलाढय़ काळ पण आत्मस्थितीपुढे तो बापूडवाणा होतो. काळाबद्दल अधिक सांगताना अवधूत म्हणाले, सामान्य माणूस देहालाच मी समजत असतो. त्याच्या जीवनात काळाची अलक्ष्य गती नाश आणि उत्पत्ती दाखवते. काळनदीच्या महावेगात तो पुढे ढकलला जाऊ लागला की त्याला षड्विकाराचे परिपूर्ण भोवरे जराजर्जर करून टाकतात. लहान आणि तरुणपणीचे खळाळ, वार्धक्मयाचें मंद जळ, जन्ममरणांचे फेरे असे अतिकल्लोळ उठतात. योग्याने हे सर्व जाणून रहावे. काळाची देहावर चालणारी सत्ता लक्षात घ्यावी आणि आत्मवस्तू देहापेक्षा भिन्न आहे ही गोष्ट मनावर ठसवावी म्हणजे वेळीच काळाची पावले त्याला ओळखता येतील. मग ती कशीही पडली तरी योग्याच्या मनःस्थितीत फरक पडणार नाही.