भाजप-तृणमूल कार्यकर्ते आमने-सामने ः हिंसाचाराची भीती
पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यात कूचबिहार येथे झालेल्या हिंसाचारात 5 जणांचा मृत्यू झाला आहे. पण 5 व्या टप्प्यात कुठलीच मोठी हिंसक घटना घडली नव्हती. पण अद्याप तीन टप्प्यांमधील मतदान शिल्लक आहे. याचमुळे निवडणूक आयोग विशेष खबरदारी घेत आहे. आतापर्यंतच्या हिंसेच्या प्रकरणांमध्ये बहुतांशी तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते परस्परांना भिडले आहेत. 4 जिल्हय़ांमधील 43 मतदारसंघांमध्ये गुरुवारी मतदान होत आहे. या जिल्हय़ांमध्ये मोडणाऱया लोकसभेच्या बहुतांश मतदारसंघांवर भाजपचा कब्जा आहे. तर विधानसभा मतदारसंघांमध्ये तृणमूलचे वर्चस्व आहे.
उत्तर दिनाजपूर जिल्हय़ातील सर्व 9 जगा, नादियातील 17 पैकी 9, उत्तर 24 परगण्यातील 33 पैकी 17 मतदारसंघ तर वर्धमान जिल्हय़ातील 24 पैकी 8 मतदारसंघांमध्ये गुरुवारी मतदान आहे. उत्तर दिनाजपूर जिल्हय़ात लोकसभेचे दार्जिलिंग, रायगंज आणि बालुरघाट हे तीन मतदारसंघ येतात. तिन्ही ठिकाणी भाजपचा खासदार आहे. तर 9 विधानसभा मतदारसंघांपैकी 6 ठिकाणी तृणमूल, एका जागेवर माकप, एका ठिकाणी फॉरवर्ड ब्लॉक आणि एका ठिकाणी काँग्रेसचा आमदार आहे.
लोकसभेत भाजप आघाडीवर
नादिया जिल्हय़ातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एका ठिकाणी भाजप तर दुसऱया जागेवर तृणमूलचा खासदार आहे. तर येथील 17 विधानसभा मतदारसंघांपैकी तृणमूलचे 13, काँग्रेसचे 2 आणि भाजप तसेच डाव्यांचा प्रत्येकी एक आमदार आहे. उत्तर 24 परगण्यातील दोन लोकसभा जागांपैकी एका ठिकाणी तृणमूल तर दुसऱया ठिकाणी भाजपचा खासदार आहे. विधानसभेच्या 12 पैकी 9 जागांवर तृणमूलचे आमदार आहेत. 2 ठिकाणी माकप तर एका जागेवर भाजपचा आमदार आहे. नदियाच्या रानाघाट, उत्तर 24 परगण्यातील बैरकपूर आणि बनगाव हे भाजप खासदारांचा प्रभाव असलेले मतदारसंघ आहेत. याचबरोबर हुगळी, वर्धमान, दुर्गापूर आणि आसनसोलमधील शिल्पांचल देखील भाजप खासदारांचा प्रभाव असलेले मतदारसंघ आहेत.
हिंसक घटनांची पार्श्वभूमी
गृह मंत्रालयानुसार मागील वर्षी बंगालमध्ये राजकीय हिंसाचाराच्या एकूण 663 घटना घडल्या तर एकूण 57 जणांचा मृत्यू झाला होता. 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीदरम्यान बंगालमध्ये हिंसाचाराच्या एकूण 693 घटनांची नोंद झाली आणि 11 जणांचा मृत्यू झाला. 1 जून 2019 ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत राजकीय हिंसाचाराच्या एकूण 852 घटनांची नोंद झाली आणि 61 जणांना जीव गमवावा लागला होता. तर 2018 च्या पंचायत निवडणुकीदरम्यान 23 जणांचा मृत्यू झाला होता.