200 हून अधिक बूथवर ईव्हीएममध्ये बिघाड : गोरखपूरमध्ये सर्वाधिक तक्रारी
लखनौ / वृत्तसंस्था
सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 10 जिल्हय़ांतील 57 जागांवर गुरुवारी मतदान झाले. दुपारी 3 वाजेपर्यंत 46.70 टक्के तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 53.31 टक्के मतदान झाले होते. एकंदर दिवसअखेरपर्यंत मतदानाचा आकडा 60 टक्क्यांच्या आसपास पोहोचण्याची माहिती निवडणूक आयोगाकडून देण्यात आली. या टप्प्यातील मतदानादरम्यान 200 हून अधिक ठिकाणी ईव्हीएममध्ये बिघाड झाला. सर्वाधिक तक्रारी गोरखपूर, महाराजगंज, बस्ती येथून आल्या आहेत. दुसरीकडे, मानबेलामध्येही ईव्हीएम बिघडल्याच्या तक्रारी नोंद झाल्या असून निवडणूक कर्मचारी-अधिकाऱयांनी वेळीच त्रुटी दूर करण्याचे प्रयत्न केले.
सहाव्या टप्प्यासाठी एकंदर 676 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतदानयंत्रात बंद झाले आहे. या टप्प्यात आंबेडकर नगर, बलरामपूर, सिद्धार्थनगर, बस्ती, संत कबीरनगर, महाराजगंज, गोरखपूर, कुशीनगर, देवरिया आणि बलिया जिल्हय़ांमध्ये मतदान पार पडले. 2017 मध्ये येथील 57 जागांपैकी भाजपने 46 जागा जिंकल्या होत्या. उत्तर प्रदेशमध्ये आता फक्त सातव्या टप्प्यातील मतदान बाकी आहे. सातवा टप्पा 7 मार्च रोजी समाप्त झाल्यानंतर 10 मार्च रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर केले जाणार आहेत. उत्तर प्रदेशसोबतच गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरमध्येही त्याचदिवशी मतमोजणी होणार आहे.
काही भागात तणावपूर्ण वातावरण
गोरखपूरमधून निवडणूक लढवणाऱया चंद्रशेखर यांनी एका महिला मतदाराकडून बोगस मतदान झाल्याचा आरोप केल्यामुळे काहीवेळ वातावरण तंग बनले होते. शिवपूर सेहबाजगंजमध्ये मतदान करण्यासाठी आलेल्या महिलेला तिचे मतदान आधीच झाले असल्याचे सांगण्यात आले. यावेळी बूथवर पोहोचलेल्या चंद्रशेखरना पाहताच विरोधकांनी गोंधळ घातला. दुसरीकडे, कुशीनगरच्या फाजिलनगर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे स्वामी प्रसाद मौर्य यांचा मुलगा अशोक याला पोलिसांना जिल्हाबंदी करावी लागली. बुधवारी रात्री पैसे वाटल्याच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अशोक मौर्यला ताब्यात घेतले होते. रात्री सुमारे 8 तास त्यांना पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्यानंतर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जिह्यात न येण्याच्या सूचना देऊन त्यांना सोडून देण्यात आले.