गृहमंत्री अमित शहा, राष्टीय अध्यक्ष नड्डा यांच्या जाहीर सभा
पश्चिम बंगालच्या पाचव्या टप्प्याचे मतदान आज शनिवारी होत आहे. त्यामुळे या टप्प्याचा प्रचार तीन दिवसांपूर्वीच थांबला आहे. आता सहाव्या टप्प्याची तयारी सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी शनिवारी या टप्प्यातील अनेक मतदारसंघांमध्ये जाहीर सभा घेतल्या व रोड शो ही केले. अमित शहा यांनी काँगेसवर कडाडून टीका केली.
राहुल गांधी या राज्यात एकाद्या पर्यटकासारखे आले. दोन सभांमध्ये बोलले आणि निघून गेले. त्यांनी भाजपच्या डीएनएचा कुत्सित भाषेत उहापोह केला. पण त्यांना भाजपचा डीएनए माहीत नाही. डी फॉर डेव्हलपमेंट, एन फॉन नॅशनॅलिझम आणि ए फॉर आत्मनिर्भर भारत असा भाजपचा ‘डीएनए’ आहे, असा टोला त्यांनी लगावला. ममता बॅनर्जींनी अल्पसंख्याकांच्या तुष्टीकरणाचे धोरण अवलंबून राज्याचे फार मोठे नुकसान केले. भाजप सत्तेवर आल्यास घुसखोरांवर कारवाई केली जाईल व राज्यातील जनतेला गुंडगिरीपासून संरक्षण दिले जाईल. राज्यातील दलित व मागासवर्गियांच्या कल्याणाचे कार्यक्रम हाती घेतले जातील. शिक्षण आणि आरोग्य यांचीही सोय केली जाईल, असे प्रतिपादन त्यांनी केले.
100 कोटींची योजना
मतुआ आणि नामशूद्र या समाजघटकांसाठी 100 कोटी रूपयांचा निधी स्थापन केला जाईल. हे समाज 70 वर्षांपूर्वीच भारतात आले आहेत. मात्र, त्यांना आजही या देशात मानाचे स्थान मिळत नाही. कित्येकांना देशाचे स्थायी नागरीकत्वही मिळालेले नाही. या सर्व त्रुटी भाजप सत्तेवर आल्यास दूर केल्या जातील आणि शरणार्थींच्या विकासासाठी योजना होतील असेही आश्वासन त्यांनी दिले.