अहमदनगर /प्रतिनिधी
खासदार संभाजीराजे यांनी आज (शनिवार) कोपर्डी येथे जाऊन सामुहिक बलात्काराच्या घटनेतील पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यांनतर माध्यमांशी बोलताना संभाजीराजे यांनी सहा महिन्यात हे सर्व प्रकरण निकाली लागायला हवं. कोपर्डीमधील निर्भयाला लवकरात लवकर न्याय मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, मराठा समाजानं आरक्षणासाठी ५८ मोर्चे काढून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे आता समाज रस्त्यावर येणार नाही. तर आता लोकप्रतिनिधींनी सरकारशी बोलायचं आहे. त्याचबरोबर राज्य सरकारनं समाजाच्या पाच प्रमुख मागण्या मान्य कराव्यात आम्ही तुमचं स्वागत करु, असं प्रतिपादन त्यांनी केलं आहे. कोपर्डी येथे ते बोलत होते. यावेळी संभाजीराजे यांनी कोपर्डीतील निर्भयाला न्याय अद्यापही मिळालेला नाही. तिला लवकरात लवकर न्याय मिळावा अशी मागणीही त्यांनी केली. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी देखील बोलणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संभाजीराजे म्हणाले, मी इथं पीडितेच्या कुटुंबीयांना भेटलो, त्यांच्याही मनात आक्रोश होता. त्यांची एवढीच इच्छा होती की समाजाला न्याय मिळावा आणि आमच्या भगिनीला न्याय मिळावा. म्हणून माझी सरकारला हीच विनंती राहणार आहे, तुम्ही तत्काळ उच्च न्यायालयाला अर्ज करावा व त्यामध्ये तुम्ही नमूद करणं गरजेचं आहे, विशेष खंडपीठ स्थापन केलं पाहिजे. विशेष खंडपीठाच्या माध्यमातून सहा महिन्यात हा केसचा निकाल लागला पाहिजे. इथून गेल्यानंतर हे मी ताबडोब मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे.”