914 अफगाणिस्तानी, 172 बांगलादेशींनाही नागरिकत्व : निर्मला सीतारामन यांची माहिती
चेन्नई / वृत्तसंस्था
गेल्या सहा वर्षांमध्ये 2 हजार 838 पाकिस्तानी, 914 अफगाणिस्तानी आणि 172 बांगलादेशी शरणार्थींना भारताचे नागरिकत्व देण्यात आल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी चेन्नईतील एका कार्यक्रमात दिली. तसेच सुधारित नागिरकत्व कायद्याबद्दल त्यांनी सरकारची भूमिकाही स्पष्ट केली. या कायद्याच्या माध्यमातून लोकांचे आयुष्य सुकर बनविणे हा आमचा उद्देश आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीचे नागरिकत्व काढून घेतले जाणार नाही. उलट हा कायदा नागरिकत्व देणारा कायदा आहे, असे त्या म्हणाल्या.
1964 पासून 2008 सालापर्यंत श्रीलंकेतून आलेल्या जवळपास चार लाख तामिळींना भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात आले होते. त्यानंतर 2014 पर्यंत पाक, बांगलादेश आणि अफगाणिस्तान येथून आलेल्या 566 मुस्लिमांनाही भारताचे नागरिकत्व देण्यात आले, असे सांगत सीतारामन यांनी शरणार्थींना देण्यात आलेल्या नागरिकत्वाची आकडेवारीच जाहीर केली. 2016 ते 2018 या काळात पाकिस्तानच्या 1 हजार 595 आणि अफगाणिस्तानच्या 391 मुस्लिमांना भारतीय नागरिकत्व देण्यात आले होते. देशनिहाय शरणार्थींची आकडेवारी जाहीर करून सीतारामन यांनी भाजपवर होत असलेले आरोप खोडून काढण्याचा प्रयत्न केला.
भारतीय नागरिकत्व देण्यात आलेल्यांमध्ये काही मुस्लीम धर्मियांचाही समावेश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 2016 साली प्रसिद्ध गायक अदनान सामी याला भारतीय नागरिकत्व दिल्याचे सांगत प्रसिद्ध लेखिका तस्लिमा नसरीन यांचेही उदाहरण त्यांनी दिले. पाकिस्तानी, बांगलादेशी आणि अफगाणिस्तानी नागरिकांना नागरिकत्व देण्याच्या ‘सीएए’ कायद्यावरून देशात गदारोळ सुरू असल्यानेच त्यांनी ही आकडेवारी जाहीर करत या विषयावर ठळकपणे प्रकाशझोत टाकला आहे.