प्रतिनिधी/ पणजी
स्वतःच्या पाळी मतदारसंघात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी चालविलेला सत्तेचा माज त्यांना प्रचंड महागात पडणार असून येत्या निवडणुकीत त्यांचा पराभव अटळ आहे, असे भाकित काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी वर्तविले आहे. सांखळी पालिका ताब्यात घेण्यासाठी केलेल्या प्रत्येक प्रयत्नात मुख्यमंत्री तोंडघशी पडले असून मतदारसंघात तोंड दाखविण्यास त्यांनी जागा ठेवलेली नाही, अशी टीकाही त्यांनी केली आहे.
काँग्रेस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यावेळी सांखळीचे नगरसेवक धर्मेश सगलानी, राजेश सावळ, माजी सरपंच प्रवीण ब्लेगन व माजी नगराध्यक्ष रियाज खान यांची उपस्थिती होती.
सक्षम नेतृत्वाच्या अभावातून भारतीय जनता पार्टीने गोव्यात लोकशाहीचे धिंडवडे व संविधानाची चेष्टा चालविली आहे. अपघाताने सत्तास्थानी आलेले विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या डोक्यात सत्तेची नशा भिनली आहे. तोच माज ते प्रत्येक ठिकाणी प्रदर्शित करत आहेत. त्यामुळेच त्यांनी न्यायव्यवस्थेलाही गृहित धरले आहे. परंतु न्यायव्यवस्था वेळोवेळी त्यांची कानउघाडणी करत असल्यामुळे प्रत्येक निर्णय त्यांच्या अंगलट येत आहे, असे चोडणकर म्हणाले.
केवळ सत्ता मिळविण्याच्या नादात भाजप योग्य व सक्षम नेतृत्व, चांगले नेते तयार करण्यात अपयशी ठरला. ‘मत कुणालाही मारा, सत्ता आमचीच. निवडून कुणालाही द्या, सरकार आमचेच’ हे एकच धोरण ते राबवत राहिले. परिणामी प्रमोद सावंत सारख्या असक्षम व्यक्तीच्या हाती सत्ता द्यावी लागली. भाजपात जनतेच्या कौलाला काडीचीही किंमत, आदर नाही. लोकशाही, न्यायव्यवस्था ते मानत नाही. लोकांनी नाकारले तरीही त्यांना केवळ सत्ता हवी व त्या हव्यासापोटी ते कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात हे गत दोन निवडणुकांमधून दिसून आले आहे, असे चोडणकर म्हणाले.
सत्तेसाठी कितीही किंमत मोजून पंचापासून आमदारापर्यंत कुणालाही एका रात्रीत खरेदी करता येते हे तंत्र त्यांनी आत्मसात केले आहे. याचा प्रत्यय सांखळी तसेच केपे पालिका निवडणुकीवेळी आला आहे. केपे निवडणुकीत भाजपविरोधी उमेदवारास माघार घेण्यासाठी ’भूखंड’ देण्याची ’ऑफर’ दिली होती तर सांखळीत काही नगरसेवकांना ’हवे ते मागा आम्ही देऊ’ अशी आमिषे देण्यात आली होती, असा दावा यावेळी करण्यात आला. परंतु आरएसएसच्या तथाकथित आत्मनिर्भर युनिटमध्ये सक्षम नेते तयार करण्याची क्षमता नाही, असे चोडणकर म्हणाले.
या सर्व अनुभवातून आता लोकांनी धडा घ्यावा व येत्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून द्या. तत्पूर्वी केवळ आठ महिने धैर्य ठेवा. पुढील सरकार हे काँग्रेसचे असेल. त्यानंतर गोव्याला सर्व समस्यांतून मुक्त करून योग्य दिशेने नेले जाईल, लोकांना न्याय मिळेल, असे आश्वासन चोडणकर यांनी दिले.
पैसे व प्रॉपर्टीच्या मोहास बळी न पडता सांखळीतील नगरेसवकांनी ज्या प्रकारे एकजूट, पक्षनिष्ठा दाखविली त्यासाठी चोडणकर यांनी त्यांचे अभिनंदन केले. अशीच पक्षनिष्ठा भाजपात गेलेल्या ’त्या आमदारांनी’ दाखविली असती तर हे भ्रष्ट आणि लोकशाहीविरोधी सरकार सत्तेवरच आले नसते, असे चोडणकर म्हणाले.
आज अनेक अधिकारी मिंधे बनून मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून बेकायदेशीर कामे करत आहेत. सांखळीत सगलानी गटाची सत्ता येऊ नये यासाठी मुख्यमंत्री मुख्याधिकाऱयांच्या मदतीने अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न करत आहेत. नगराध्यक्षांच्या केबिनला कुलूप ठोकून उपनगराध्यक्षांना पदभार नाकारण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. एक दिवस हेच मुख्यमंत्री त्यांना तोंडघशी पाडणार आहेत. त्यातून त्यांच्यावर कायदेशीर कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते, असा इशारा चोडणकर यांनी दिला.
सत्तेसाठी भाजप राज्याचे नुकसान करत आहे. तसेच गृह आधार, लाडली लक्ष्मी यासारख्या विविध योजनांपासून वंचित ठेवण्याच्या धमक्याही देत आहे, असे राजेश सावळ यांनी सांगितले. आपणाला सतावण्यासाठी स्वतः मुख्यमंत्र्यांनी प्रचंड शक्ती खर्ची घातली, परंतु त्यात ते सपशेल अपयशी ठरले, असेही सावळ म्हणाले. मुख्यमंत्र्यांच्या सावलीत राहून गब्बर बनलेल्या स्थानिक अदानी, अंबानींकडून कोटय़वधींच्या ऑफर्स देण्यात आल्या होत्या, असे ब्लेगन यांनी सांगितले.
दरम्यान, सांखळीचा नगराध्यक्ष निवडण्या संदर्भात आता तरी मुख्यमंत्र्यांनी अधिक अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न न करता कायद्यानुसार प्रक्रिया पुढे न्यावी, असे आवाहन चोडणकर यांनी केले आहे.