काम पूर्ण झाल्यास 24 रोजी उद्घाटन
सुरेश बायेकर /साखळी
राज्यातील डिचोली-सांखळी मतदारसंघांच्या विकासात भर घालणारा आणि सुरळीत वाहतुकीसाठी अत्यावश्यक अशा विठ्ठलापूर ते सांखळी या अत्यंत महत्वाकांक्षी पुलाचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. सदर पुलाचे काम पूर्ण झाल्यास येत्या 24 एप्रिल रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा वाढदिवस असल्याने त्यादिवशी या पुलाचे उदघाटन करण्याचा बेत आखण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली आहे. पुलाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी सध्या या कामावरील मजुरांची संख्या दुपटीने वाढविण्यात आलेली आहे. दोन्ही टोकांकडील रस्ते तयार होताना दिसत आहे हा पूल जसजसा तयार होत आहे तस्तस्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे, असे स्थनिक जेष्ट नागरिकांचे म्हणणे आहे
या पुलासाठी दोन्ही किनारी उभारण्यात आलेल्या काँक्रीट खांबांवर लोखंडी स्पेन चढविण्यात आलेले आहे तर सदर स्पेनवर लोखंडी प्लेट मारण्याचे काम जोरात सुरू आहे. येत्या दोन दिवसांनंतर सदर पुलावरील रस्त्याचे प्राथमिक काम हाती घेण्यात येणार आहे. काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार आहे. पूलाला जोडणाऱया विठ्ठलापूर बंदिरवाडा बाजूचा जोडरस्त्यांचेही काम जोरदारपणे सुरू आहे. जोडरस्त्याच्या दोन्ही बाजूंनी सरंक्षण भिंती उभारण्यात आलेल्या असून मातीचा भराव घालून पुलाच्या पातळीवर रस्ता बबनवण्यात येणार आहे.
दोन्ही बाजूने जोडरस्त्यांचा विषय निकालात
सांखळी बाजारात सदर पुलाचा दुसरा भाग असून बाजाराच्या बाजूने रस्त्याच्या कामासाठीही दोन्ही बाजूंनी संरक्षण भिंती उभारण्यात आलेल्या आहेत. याही ठिकाणी मातीचा भराव टाकून पुलाच्या पातळीपर्यंत सपाटीकरण करण्यात येणार आहे. बाजारातून या पुलाचा रस्ता जात असल्याने सदर रस्त्याच्या मध्ये येणारे अडथळे दूर करताना किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गाळय़ांचे यापूर्वीच स्थलांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे पुलापासून बाजारात येणारा रस्ता हा खुला राहणार आहे
बंदिरवाडा विठ्ठलापूर बाजूने पुलाच्या जोडरस्त्या जवळ असलेल्या दुकानांचे त्याच ठिकाणी थोडय़ाशा मागच्या बाजूने स्थलांतर करण्यात येणार आहे. त्यासाठीही काम सुरू आहे. मागच्या बाजूला संरक्षण भिंत उभारण्यात आलेली असून सदर भिंतीची कडा धरून दुकाने साकारून देण्यात येणार आहे आणि सदर रस्त्याला अडथळा ठरणारी दुकाने हटविण्यात येणार असल्याचे समजते. तशी माहिती या प्रकल्पाच्या पर्यवेक्षकांनी दिली. त्यामुळे बंदिरवाडा विठ्ठलापूर बाजूने जोडरस्त्याचाही प्रश्न मिटणार आहे.
लॉकडाऊनमुळे पुलाच्या लोकार्पणाला विलंब
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कल्पनेतून सांखळीच्या विकासात भर घालणाऱया आणि मुख्य रस्त्यावरील वाहतुकीचा ताण काही प्रमाणात कमी करणाऱया या पुलाची संकल्पना पुढे आली. या पुलाची पायाभरणी गेल्या 16 फेब्रु. 2020 रोजी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते आमदार प्रवीण झांटय़े, ज्योसुआ डिसोझा, तत्कालीन नगराध्यक्ष धर्मेश सगलानी व इतरांच्या उपस्थितीत करण्यात आली होती. त्यावेळी या पुलाच्या कंत्राटदाराने येत्या जून (2020) महिन्यातच पुलाचे काम पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र मार्च महिन्यात कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने त्याचा परिणाम या पुलाच्या कामावर झाला. लॉकडाऊनमुळे या पुलाच्या लोकार्पणाला विलंब झाला. अन्यथा गेल्या चतुर्थीपूर्वीच सदर पुलाचे काम पूर्ण होऊन तो लोकांसाठी खुला झाला असता, असे ही जाणकारानी या विषयावर बोलताना मत व्यक्त केले
सांखळी करांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळतोय : आनंद काणेकर
सांखळी बाजारकरमंडळीच्या खूप जुन्या आठवणी विठ्ठलापूर सांखळी पुलाशी जोडलेल्या आहेत. पूर्वी याच ठिकाणी एक पूल होता तो तेव्हाच्या शासन कर्त्यांनी मोडला. कालांतराने त्या जागी लोखंडीपूल उभारण्यात आला आणि आता स्थानिक आमदार तथा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली वाळवंटी नदीवर नवीन पूल बांधण्यात आला असल्याने सांखळी शहरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यावरील कार्यक्रमावेळी होणारी वाहतूक कोंडी सुरळीत होणार असून सांखळी बाजारासही नवसंजीवनी प्राप्त होणार आहे, असे स्थनिक नगरसेवक आंनद काणेकर यांनी या विषयी बोलताना सांगितले.
संखळी कारापूर पूल बाजारपेठेला अत्यंत गरजेचा होय : पियुष डांगी
दोन गावाना जोडणार हा पूल बाजारपेठेसाठी चांगली सोय आणि वळन देणारा ठरणार आहे. यामुळे बाजारात खरेदी- विक्रीसाठी ग्राहकांना येणे सोयीस्कर होणार आहे. सरकारचा हा प्रकल्प आम्हा बाजारकर मंडळींना नवसंजीवनी देणार आहे. त्यामुळे स्थानिक आमदार डॉ प्रमोद सावंत यांचे अभिनंदन. हा पूल पूर्ण होताच सांखळी शहरातील बाजार संबंधीत अनेक समस्या दूर होणार असून बाजारात ग्राहक वाढतील हे नक्की, असे मत व्यापारी संघटनेचे पदाधिकारी पियुष डांगी यांनी व्यक्त केले.