मुंबई/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली असली तरी अजूनही राज्यातील काही जिल्ह्यांतील परिस्थिती चिंतेत भर घालणारीच आहे. राज्यातील काही जिल्ह्यात करोना रुग्णसंख्याजास्त आहे. यात पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचा समावेश असून, याच मुद्द्यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. निलेश राणे यांनी ” सांगलीचा पालकमंत्री बदला जिल्हा वाचवा”, अशी टीका जयंत पाटील यांच्यावर केली आहे.
नुकताच केंद्रीय पथकाने कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी पथकाने जिल्ह्यांना भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील परिस्थितीबद्दल केंद्रीय आरोग्य पथकाने चिंता व्यक्त केली. दोन्ही जिल्ह्यातील पाहणी केंद्रीय पथकाने केली. त्याचबरोबर दोन्ही जिल्ह्यात पुन्हा संपूर्ण कडक लॉकडाऊन लावण्याचा सल्लाही केंद्रीय पथकाने दिला आहे. केंद्रीय पथकाने दिलेल्या सल्ल्यावरून आता निलेश राणे यांनी सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांना हटवण्याची मागणी केली आहे.निलेश राणे यांनी ट्वीट करत जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. जिल्हा वाचवायचा असेल, तर जयंत पाटील यांना पालकमंत्री पदावरून हटवा, असं माजी खासदार राणे यांनी म्हटलं आहे.
तसेच निलेश राणे यांनी “सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील मैदानात उतरले, आता करोना आटोक्यात येणार, अशा बातम्या सातत्यानं काही महिन्यापूर्वी चालत होत्या. मागच्या आठवड्यात एक सर्वे झाला, त्यामध्ये सांगली जिल्ह्यात परत कडक लॅाकडाउन करावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे… त्यामुळे “सांगलीचा पालकमंत्री बदला, जिल्हा वाचवा”, अशी टीका राणे यांनी केली आहे.