प्रतिनिधी / सांगली
कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने एक रकमी एफआरपी देऊ शकतात, सांगली जिल्ह्यातील एक खासगी कारखानाही एक रकमी पैसे देऊ शकतो. मग जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील दिग्गज कारखानदार एकरकमी एफ.आर.पी. का देऊ शकत नाहीत असा खडा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकारांशी बोलताना केला.
शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या मोर्चासाठी ते सांगलीत आले होते. त्यावेळी ते बोलत होते. ऊस दर नियंत्रण कायद्यान्वये 14 दिवसात उसाचे बिल न दिल्यास शेतकऱ्यांना पंधरा टक्के व्याज देण्याची तरतूद कायद्यात आहे, तथापि सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी शेतकऱ्यांचे पैसे अडवून ठेवले आहेत असा आरोप करून शेट्टी म्हणाले कारखानदारांचे मडे घेऊन आम्ही जिल्हा प्रशासनाकडे आलो होतो, तथापि पोलिसांनी आमचे प्रतीकात्मक मडे काढून घेतले.
मंत्र्यांची फुस असल्याशिवाय सांगलीतील पोलीस असे वागणार नाहीत. सांगली पोलिसांमध्येही. सचिन वाझे असून या पोलिसांनी खाल्ल्या मिठाला जागले पाहिजे नाहीतर त्यांच्या लांब बदल्या होतात असा टोला मारून शेट्टी यांनी सांगली पोलिसांचा निषेध केला.