सांगली/प्रतिनिधी
मेट्रो रेल्वेच्या एक कि. मी. निर्मितीला तीनशे ते साडेतीनशे कोटी खर्च येतो. त्यापेक्षा इलेक्ट्रिक बस सुरू करायला अत्यंत कमी खर्च येतो. सांगली शहरात इलेक्ट्रिक बस सुरू करा म्हणजे कमी खर्चात त्या बस सुरू होतील त्यासाठी लागणारी मदत आपण स्वतः करतो असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
पीएनजीच्या190 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात सिनेअभिनेते राहुल सोलापूरकर यांनी मंत्री गडकरी यांची मुलाखत घेतली, त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी पालकमंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजीत कदम, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी पालक मंत्री सुभाष देशमुख ,खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे, आमदार अनिल बाबर यांच्यासह जिल्ह्यातील मंत्री व आमदार उपस्थित होते.
गडकरी यांनी या मुलाखती मध्ये वैयक्तिक प्रश्नाबरोबरच राजकीय क्षेत्रातील अनेक गोष्टींचा सडेतोड खुलासा केला. राजकारण्यांनी नेहमी राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करावे असे आवाहनही त्यांनी केले. रस्ते निर्मितीत आपण कधीही दर्जात तडजोड करत नसल्याचे त्यांनी सांगितले. पर्यावरणाचे रक्षण झाले पाहिजे याची दक्षता ही रस्ते निर्मिती करताना घेतली जाते असेही त्यांनी स्पष्ट केले. स्वागत समीर गाडगीळ यांनी केले, आभार सिद्धार्थ गाडगीळ यांनी मानले.