पृथ्वीराज पाटील फौंडेशनचा पुढाकार : कारणे, उपाययोजनांवर चर्चा : ठराव शासनाला सादर करणार
प्रतिनिधी / सांगली
सातत्याने येणाऱ्या महापूरामुळे नागरिकांच्या मनामध्ये भिती व काळजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे महापुराबाबत गांभिर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे. यासाठीच शनिवार 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 4 वाजता पृथ्वीराज पाटील फौंडेशनच्यावतीने येथील डेक्कन मॅन्युपॅक्चरर्स असोसिएशनच्या हॉलमध्ये सांगली पूर परिषदेचे आयोजन केले आहे. यामध्ये महापूराची कारणे, ठोस उपाययोजना याबाबत चर्चा होईल, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार बैठकीत बोलताना दिली.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते परिषदेचे उदघाटन होणार आहे. तर कृषिराज्यमंत्री विश्वजीत कदम प्रमुख पाहुणे असतील. याचबरोबर खासदार संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ यांचीही परिषदेला उपस्थिती असेल असे सांगत पाटील म्हणाले, वारंवार येणाऱ्या पूरासंबंधी नेमके काय धोरणात्मक बदल करायला हवेत यावर भीमा खोरे पूर अभ्यास समितीचे अध्यक्ष राजेंद्र पवार मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय प्रोजेक्ट मेघदूत अंतर्गत मान्सूनचा अभ्यास करणारे तसेच सेंटर फॉर सिटीजन सायन्सचे संचालक मयुरेश प्रभुणे, वसंत भोसले, आभाळमाया फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद चौगुले हे परिषदेत सहभागी होणार आहेत.
महापूराचा योग्य तो अभ्यास व्हावा, त्यावर कायमस्वरुपी ठोस उपाययोजना कराव्यात, तसेच या संकटातून पूरग्रस्तांची सुटका व्हावी या उद्देशानेच या परिषदेचे आयोजन केले असल्याचे सांगत पाटील म्हणाले, डेक्कनच्या हॉलमध्ये सायंकाळी चार वाजता परिषदेस सुरूवात होईल. कोविड बंधनामुळे ठराविक व्यक्तींना निमंत्रीत करण्यात आले आहे. ज्यांना परिषदेत सहभागी व्हायचे आहे. प्रश्न, उपाययोजना मांडायच्या आहेत, त्यांना `ऑनलाईन’ सहभागी होता येणार आहे. परिषदेत मांडले जाणारे महत्वाचे मुद्दे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह शासनातील अन्य मंत्र्यांना दहा कलमी ठरावाद्वारे सादर करणार, असेही पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितले.
कारणे, उपाययोजनांवर सखोल चर्चा
गेल्या काही वर्षापासून पावसाळ्यात दरवर्षी सांगली शहरासह कृष्णा काठच्या अनेक गावांना महापूराचा तडाखा बसतो. यामुळे बाजारपेठेसह शेती, घरे, नागरिक, व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. त्यामुळे महापूर आता गांािभर्याने घेण्याची गरज आहे. यासाठीच सांगली पूर परिषदेचे आयोजन केले आहे. यामध्ये महापूराची कारणे, उपययोजना यावर सखोल चर्चा होईल.
पृथ्वीराज पाटील, जिल्हाध्यक्ष, सांगली.