पूर्वसंध्येला बाजारात गर्दी, गणेशभक्तांमध्ये अलोट उत्साह, गणपती मंदिरावर आकर्षक रोषणाई पण भाविकांना रोषणाई संस्थानच्या श्रीं ची आज प्रतिष्ठापना
प्रतिनिधी / सांगली
‘गणपती बाप्पा मोरया’ च्या गजरात शुक्रवारी घरोघरी गणरायाचे आगमन झाले. मारूती चौक, बालाजी चौक रोडवर गणेश मूर्ती, आरास साहित्य, पुजेचे साहित्य यांचे स्टॉल लागले होते. शुक्रवारी शहरातील कापड पेठ, गणपती पेठ, गावभाग, स्टँड परिसर, खणभाग, राममंदिर चौक परिसरातून भाविकांनी गणरायाची मूर्ती घरी आणली. पुष्पराज चौक येथील परिसरातही गणेशमुर्तींचे स्टॉल असल्याने तेथूनही मोठय़ा प्रमाणात गणरायाच्या मूर्ती नेण्यात आल्या.
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा होत असतानाच गुरुवार व शुक्रवार दोन्ही दिवशी बाजारात मोठी गर्दी दिसून आली. अनेकांनी आठवडाभर आधी बुकिंग करून शुक्रवारी मूर्ती घरी आणली. तसेच हरितालिका व गणेशाच्या पूजेच्या आणि सजावटीच्या साहित्यांचीही मोठी खरेदीविक्री झाली. गणेशाची आज शनिवारी प्रतिष्ठापना होणार असली तरी दिड दिवसाचे गणपती, तसेच काही उत्साही भाविकांनी सणादिवशी होणारी गर्दी टाळण्यासाठी एक दिवस आधीच गणरायाला घरी आणले. विधिवत पूजा करुन गणेशाची शनिवारीही अनेक गणरायांची प्रतिष्ठापना होणार आहे.
गणपती पंचायतन संस्थानमध्ये बुधवारीच चोर गणपती विराजमान झाले आहेत, तर दरबार हॉल येथील उत्सव आजपासून सुरू होत आहे. यंदा संस्थानमध्ये प्रतिष्ठापना व विसर्जन अत्यंत साधेपणाने होणार आहे. तसेच भाविकांना कोरोनामुळे यंदा दर्शन घेता येणार नसून, दरबार हॉल व मंदिर बंदच राहणार आहे. तर कोरोनामुळे सायंकाळी सात नंतर दुकाने, स्टॉल बंद होत असल्याने खरेदीसाठी नागरिकांनी गुरुवारी व शुक्रवारी सायंकाळी मोठी गर्दी केली. बाजारात आरास सजावटीसाठी लागणाऱया विविध वस्तूंनी, साहित्यांचे स्टॉल सजले असून, टाकाऊपासून टिकाऊ साहित्य खरेदी करण्याकडे भाविकांचा कल असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
यंदा थर्माकोल बंदीमुळे मोठय़ा प्रमाणावर प्लायवूड, पुठ्ठा, वेलवेट, एलईडी, लेस, अशा आकर्षक सजावटीचे सिंहासन, बैठका, मंदिर-मखरे दिसून येत होती. तसेच पूजेसाठी लागणारी फुले, हार, दुर्वा, कापूर, केळी, कापूस वस्त्र, विविध फळे, नारळ, केवडा, कमळ, झीरमुळय़ा, तोरण, मोरपीसे, अशा विविध साहित्यांची बाजारात रेलचेल दिसून येत आहे. पुजेच्या व आरासाच्या साहित्यांबरोबरच फुलांची व फळांचीही मोठय़ा प्रमाणावर विक्री होत आहे. पूजेला लागणाऱया पाच फळांचे दर 40 ते 80 रुपये असून, यामध्ये कवठ, डाळिंब, संत्री, चिकू, सफरचंद व सिताफळांचा समावेश आहे. तर वसई केळी 25 ते 50 रुपये व देशी केळी 40 ते 80 रुपये डझन दराने विकली जात आहेत. आता चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत शहरात उत्सवाची लगबग दिसणार आहे.