प्रतिनिधी / सांगली
गुरुवारपासून कृष्णा नदीच्या महापुराने घेतलेला रुद्रावतार आणि सांगलीसह कृष्णा, वारणा काठाला घातलेला महापुराचा विळखा मंगळवारी सैलावला. कृष्णेची पातळी 45 आहे. त्या दिशेने उतार सुरु झाला आहे. मंगळवारी पंचनामे सुरू झाले असून 800 कोटींचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शहरात स्वच्छता व साफसफाईच्या कामाला वेग आला आहे. मंगळवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या सहा तासात केवळ एक फूट पाणी ओसरले.
सांगली- कोल्हापूर व राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीस खुला झाला आहे. तथापि हवामान विभागाने शुक्रवार आणि शनिवारी सातारा व पुणे जिल्ह्यात मोठ्या पावसाचा इशारा दिला आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आजपासून सांगली कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत.
धरणांबरोबर फ्री कॅचमेंट क्षेत्रातील अतिवृष्टी आणि धरणातील विसर्गामुळे कृष्णेने तर एका रात्रीत धोका पातळी ओलांडली. मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यातील 45 हजार कुटूंबांचे स्थलांतर करावे लागले. 103 गावांना फटका बसला. तर 142 गावे बाधीत झाली. राष्ट्रीय आणि राज्य मार्गासह तब्बल पाऊणशे रस्ते पाण्याखाली गेल्याने सांगलीला जोडणारे रस्ते बंद झाले होते.
सोमवारी रात्रीपासून महापुराला उतार लागला असला तरी फुटाने वाढलेला महापूर आता इंचाइंचाने उतरू लागला आहे. मंगळवारी चार फूट कृष्णेची पातळी उतरली. त्यामुळे सांगलीकरांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. मंगळवारी सांगलीत स्वच्छता, कचरा उठाव आणि औषध फवारणीला गती आली आहे.
आठशे कोटीवर नुकसान, स्वच्छतेसाठी 6 कोटींची मागणी
कृष्णा आणि वारणा काठाची 38 हजार हेक्टर शेती पाण्याखाली असून 91 हजारांवर शेतकऱयांना फटका बसला आहे. सध्या 50 कोटीहून अधिक नुकसानीचा दावा कृषी विभागाने केला आहे. प्रत्यक्षात पंचनाम्यानंतर आकडा वाढू शकतो. ऑगस्टमध्ये पुन्हा असाच पाऊस होण्याची शक्यता वर्तविल्याने पुन्हा महापुराची धास्ती आहे. त्यामुळे कायमस्वरूपी उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील 103 गावातील 41 हजाराहून अधिक कुटुंबे बाधित आहेत. 9660 लोक शासकीय निवारा केंद्रामध्ये आहेत. विस्थापित 32 हजार जनावरांमधील 4 हजार जनावरे शासकीय छावणीत आहेत. स्वच्छतेसाठी 6 कोटी रूपयांचा निधी आवश्यक असून आतापर्यंत 50 लाख निधी प्राप्त झाला आहे.
रस्ते व पुलांसाठी 466 कोटी
रस्ते व पूलांसाठी 466 कोटी 75 लाख, 142 गावांमधील पाणीपुरवठा खंडित सुरळीत करण्यासाठी 2 कोटी महावितरणचे ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशन, इलेक्ट्रीक लाईन, मीटर दुरूस्तीसाठी 34.40 कोटी, बाधीत रस्ते, पूल, मोऱया दुरूस्तीसाठी 74.21 कोटीची आवश्यकता आहे.
मनपासाठी 180 कोटींची मागणी
महानगरपालिका क्षेत्रातील 20 इमारती, 25 कि.मी. रस्ते दुरूस्तीसाठी 30.67 कोटी, ड्रेनेजसाठी 150 कोटी, महावितरणासाठी 28.70 कोटी निधीचा प्रस्ताव आहे. पूरबाधितांना तातडीची मदत देण्यासाठी दोन कोटींची मागणी केली आहे.
जिल्ह्याला सुमारे आठशे कोटींचा फटका : बर्डे
सध्या 466 कोटींची मागणी केली आहे. पंचनामे आणि नुकसानीची आकडेवारी अंतिम झाल्यानंतर सुमारे 800 कोटींचा फटका बसण्याची शक्यता आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी मौसमी बर्डे यांनी दिली.
धरणातील साठे आणि विसर्ग पुढीलप्रमाणे
धरण साठा विसर्ग
कोयना 90.88 33266
वारणा 31.33 7980
अलमट्टी 78.36 तीन लाख
धोम 10.68 214<ख
कण्हेर 7.94 2352
पुलांची पाणीपातळी व इसारा, धोका पातळी पुढीलप्रमाणे (फुट आणि इंचात )
कोयना कराड 27 (45,55)
कृष्णा कराड 19.11 (45,55)
बहे 9.9 (21.91,23.7)
ताकारी 41.7 (44,46)
भिलवडी 46 (51,53)
आयर्विन 47.9 (40,45)
अंकली 54.1 (45.11,50.3)