प्रतिनिधी / सांगली
राज्य शासनाने वाढीव वीज बिले माफ करण्याचे आश्वासन दिले होते. पण ते आश्वासन न पाळता आता थेट विज कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा देऊन जनतेची फसवणूक केली आहे. या नोटिसा मागे घाव्यात अन्यथा वीज वितरण कंपनीचे कामकाज रोखण्यात येईल असा इशारा भाजप महिला मोर्चाच्या अध्यक्षा नगरसेविका ऍड. स्वाती शिंदे यांनी दिला.
भाजपा महिला मोर्चाच्या वतीने आज हिराबाग कॉर्नर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला वीज कनेक्शन तोडण्याच्या नोटीसा मागे घेण्याच्या मागणीसाठी टाळे ठोकले. या ठिकाणी भाजपा महिला मोर्चाच्या महिलांनी जोरदार निदर्शने केली. महाविकास आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देण्यात आल्या.लॉकडाऊनमुळे लोकांच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडल्याने लोकांकडे पैसे नाहीत आणि सरकार तिप्पट वीज बिल वसुली करुन सर्वसामान्य लोकांच्या खिशावर दरोडा टाकत असल्याचा आरोप ऍड. स्वाती शिंदे यांनी यावेळी केला.
यावेळी ज्योती कांबळे, छाया हाक्के, स्मिता पवार, गंगा तिडके, वैशाली पाटील, सोनाली सागरे, मंगल मोरे, माधुरी वसगडेकर, सुनिता इनामदार, सुस्मिता कुलकर्णी, शैलजा पंडित, गौरी माईनकर, हिना शेख, मनीषा शिंदे, संगीता चव्हाण, मीरा मेस्त्री, निकिता चव्हाण, पूजा सुतार, आशा पवार, वंदना जाधव आदी महिला उपस्थित होत्या.