बोरगाव / वार्ताहर
कोरोना विषाणूचा वाढता धोका लक्षात घेऊन गावाच्या आरोग्याच्या दृष्टीने खबरदारीचा उपाय म्हणून बहे ग्रामपंचायतीने शुक्रवार २८ ऑगस्ट ते ३० ऑगस्ट पर्यंत तीन दिवस बहे कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
या काळात गावातील किराणा दुकान, भाजीपाला, उद्योग, व्यवसाय, बँका, बंद राहणार आहेत. दवाखाना व औषध दुकान पूर्ण दिवस सुरू राहणार आहेत आणि दूध संकलन सकाळी व संध्याकाळी ठरवून दिलेल्या वेळेत करण्यात येणार आहे या लॉकडाऊन काळात लोकांनी घरीच थांबावे घाबरून जाऊ नये अत्यावश्यक सेवेसाठी बाहेर जाणाऱ्यांनी मास्कचा वापर करणे गरजेचे आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई व दंड केला जाईल अशा सूचना ग्रामपंचायतीच्या वतीने देण्यात आल्या आहेत.
या बैठकीस राजारामबापू कारखान्याचे संचालक विठ्ठलराव पाटील, सरपंच छायाताई पाटील, माजी उपसरपंच मनोजकुमार पाटील, ग्रामपंचायत सदस्य शिवाजीराव पाटील, रोहित तोरस्कर, हेमंत सुर्यगंध, प्रवीण फल्ले, ग्रामसेवक अशोक खोत, तलाठी सुभाष पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी उपस्थित होते.