प्रतिनिधी / सांगली
सांगली जिल्ह्यात सध्या 641 कोरोना बाधित झाले असून परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्कचा वापर अनिवार्यपणे करावा. अनावश्यक गर्दी टाळावी. अन्यथा पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असा इशारा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कोविडबाबत आढावा बैठक झाली. सहकार व कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र दुडी, पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा, महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी विजया यादव यांच्यासह सर्व उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.
सांगली जिल्ह्यात आजतागायत 641 कोरोनाबाधित झाले असून यापैकी उपचाराखाली सद्यस्थितीत 304 रूग्ण आहेत तर 11 रूग्णांची स्थिती चिंताजनक आहे. तर आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. आजतागायत आढळून आलेल्या 641 रूग्णांपैकी ग्रामीण भागातील 474, शहरी भागातील 67 तर महानगरपालिका क्षेत्रातील 100 रूग्ण आहेत. रूग्णसंख्येत मोठय़ा प्रमाणावर वाढ होत असून ही स्थिती गंभीर आहे, असे सांगून पालकमंत्री जयंत पाटील यांनी तालुकानिहाय कोरोना बाधित रूग्णांचा सविस्तर आढावा घेतला. जिह्यात जवळपास 200 कंटेनमेंट झोन असून ज्याठिकाणी कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले आहेत त्या ठिकाणी कंटेनमेंट झोन आराखडय़ाची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, अशा सूचना दिल्या.
जिल्ह्यात झपाटय़ाने कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये. सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळावेत. मास्क, वैयक्तिक स्वच्छता नियम पाळून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात सर्वोतोपरी सहभाग द्यावा. सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळल्यास व आवश्यक खबरदारी न घेतल्यास जिह्यात पुन्हा लॉकडाऊन करावे लागेल, असे स्पष्ट करून पालकमंत्री जयंत पाटील म्हणाले, ज्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळले जात नाहीत त्या ठिकाणी पोलिसांनी कठोर कारवाई करावी.
यावेळी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, पुणे, मुंबईहून सांगली जिह्यात आपल्या मूळगावी आलेले चाकरमानी पुन्हा मुंबई, पुणे सारख्या ठिकाणी अल्पकालावधीसाठी ये-जा करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादूर्भाव वाढण्यास हातभार लागत आहे. अशा लोकांच्या कोरोना हॉटस्पॉट ठिकाणी ये-जा करणे बंद झाले पाहिजे. यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाने राज्य आपत्ती दलाकडे मागणी केलेल्या निधीसाठी पाठपुरावा करण्यात आलेला असून निधी लवकरच उपलब्ध होईल असे सांगितले.