काँग्रेसचे सत्याग्रह आंदोलन
प्रतिनिधी / सांगली
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला बाधा आणणारे जे दोन अन्यायकारक कायदे केले आहेत. ते तातडीने रद्द करावेत तसेच कामगारांविरोधी करण्यात आलेला कायदा ताबडतोब रद्द करावा, या मागणीसाठी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या दारात किसान अधिकार दिवस पाळून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात संपूर्ण देशभर स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हे आंदोलन करण्याचा आदेश देण्यात आला होता. या आदेशानुसार किसान अधिकार दिवस पाळून हे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले, आपला देश हा कृषिप्रधान आहे, या देशातील शेतकरी अत्यंत महत्वाचा आहे. असे असताना केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हिताला बाधा येईल आणि त्याचे नुकसान होईल अशा धर्तीचे कायदे निर्माण केले आहेत. या कायद्याने शेतकरी आणि कामगार देशोधडीला लागणार आहेत. त्यामुळे हे कायदे तातडीने रद्द केले पाहिजेत यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे. पृथ्वीराज पाटील म्हणाले, शेतकऱ्यांच्या विरोधात कायदे करणाऱ्या केंद्र सरकारला आता शेतकरी निश्चितच आपला हिसका दाखविल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. या जिल्ह्यातून या कायद्याला विरोध करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन निर्माण केले, त्याशिवाय या कायद्याला विरोध करण्यासाठी लाखो शेतकऱ्यांच्या सह्या घेतल्या आहेत. हा कायदा रद्द केल्याशिवाय आता गप्प बसणार नाही.
यावेळी आमदार विक्रमसिंह सावंत, वसंतदादा साखर कारखान्यांचे अध्यक्ष विशाल पाटील, युवा नेते जितेश कदम, महिला आघाडीच्या नेत्या श्रीमती शैलजाभाभी पाटील, जयश्रीताई पाटील, माजी जिल्हापरिषद अध्यक्षा मालन मोहिते, युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मंगेश चव्हाण, नगरसेवक मनोज सरगर, नगरसेविका वहिदा नायकवडी, कय्यूम पटवेगार, रवींद्र खराडे, नामदेवराव मोहिते, बिपीन कदम यांच्यासह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.