३१ मार्च अंतिम मुदत; पुन्हा मुदतवाढ नाही; थेट कारवाई
प्रतिनिधी / सांगली
घरपट्टी थकीत असणाऱ्या नागरिकांसाठी महापालिकेने ‘अभय’ योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत एकरकमी घरपट्टी भरणाऱ्या नागरिकांना दंड व शास्ती १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. या योजनेला थकबाकीदार नागरिकांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ अठरा दिवसात ५ हजार ३२७ थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. त्यांच्याकडून ३ कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. दरम्यान ३१ मार्च पर्यन्त ही योजना आहे. त्याचा थकबाकीदारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.
सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात मागील दोन वर्षात महापूर आणि कोरोना या परिस्थितीमूळे घरपट्टी विभागाची थकबाकी ९० कोटींवर पोहचली आहे. त्यामुळे घरपट्टी वसुलीतील दंड रकमेला माफी देण्याची अभय योजना मनपा आयुक्त नितीन कापडणीस यांनी जाहीर केली होती. अभय योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांचा घरपट्टी विभागाकडे ओढा वाढत आहे. अवघ्या १८ दिवसात ५३१७ इतक्या घरपट्टी धारकांनी अभय योजनेचा लाभ घेतला आहे. त्यातून महापालिकेला ३ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. अभय योजनेला ३१ मार्च नंतर मुदतवाढ मिळणार नाही.