येलूर फाटय़ाजवळ टँकरमधील दूध ओतले
आंदोलन यशस्वी झाल्याचा स्वाभिमानीकडून दावा
प्रतिनिधी / सांगली
राज्यात पाण्यापेक्षा दुध स्वस्त झाले आहे. दुधाला चांगला भाव मिळाला पाहिजे या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मंगळवारी राज्यात दुध संकलन बंद करण्याचे आंदोलन केले होते. या आंदोलनामुळे जिल्हय़ातील 15 लाख लिटर दुधसंकलन बंद झाल्याचा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे. या आंदोलकांनी सांगली-मुंबई महामार्गावरील येलूर फाटा येथे गोकुळ दुधसंघाचा टँकर थांबवून त्यातील 25 हजार लिटर दुध रस्त्यावर सोडण्यात आले.
सध्या गायीचे दुध पंधरा ते अठरा रूपये आहे. तर बिसलेरी पाण्याच्या एका लिटर बाटलीची किमंत 20 रूपये आहे. याचाच अर्थ पाण्यापेक्षा दुध स्वस्त झाले आहे. त्यामुळे शेतकऱयांचे कंबरडे मोडले आहे. दुध उत्पादक शेतकऱयांना शासनाने न्याय देण्याची भूमिका घ्यावी यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आठ दिवसापुर्वी दुधाला चांगला भाव मिळावा म्हणून मंगळवारी आंदोलन करणार असल्याची घोषणा केली होती. या घोषणेनुसार सांगली जिल्हय़ात पहाटे सांगली-मुंबई महामार्गावरील येलूर फाटा येथे कोल्हापूर येथील गोकुळ दुधसंघाचा टँकर अडवून त्यातील दुध रस्त्यावर सोडण्यात आले. आणि या आंदोलनाची सुरवात करण्यात आली.
जिल्हयातील शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, जत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि मिरज या दहाही तालुक्यात हे आंदोलन यशस्वी करण्यात आले आहे. या आंदोलकांच्या आक्रमकतेमुळे जिल्हय़ात दुध संघांनी दुध संकलन बंद ठेवले होते. जिल्हय़ात दररोज सरासरी 17 ते 18 लाख लिटर दुध संकलन होते. यातील 15 लाख लिटर दुध संकलन थांबले आहे. या आंदोलनामुळे राज्यशासनाचे या प्रश्नांकडे निश्चितच लक्ष जाईल असे स्वाभिमानीच्या आंदोलकांनी सांगितले.
आमच्या आंदोलनाची दखल शासन निश्चितच घेईलः खराडे
जिल्हय़ात दुध संकलन बंद हे आंदोलन 100 टक्के यशस्वी झाले आहे. या आंदोलनात कार्यकर्त्यांनी उत्स्फुर्तपणे सहभागी होत दुध संकलन बंद ठेवले आहे. यामुळे जिल्हय़ातील जवळपास 15 लाख लिटर दुधाचे संकलन थांबले आहे. या आंदोलनाला अनेक दुध संघानीही सहकार्य केले आहे. त्यामुळे या आंदोलना निश्चितच यश आले आहे. या आंदोलनाची आता शासन दखल घेईल व शेतकऱयांचा फायदा होईल असे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी सांगितले.