राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांचा आरोप
प्रतिनिधी / सांगली
आघाडी धर्माची बिघाडी राष्ट्रवादी काँग्रेसने केली नाही, तर त्याची सुरुवात काँग्रेस पक्षाकडूनच झाली असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी केला आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी धर्म पाळला नाही असा आरोप केला आहे. सांगली बाजार समितीच्या संचालकांना तसेच काही कार्यकर्त्यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादीत चुकीच्या पद्धतीने प्रवेश दिला असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
त्यावर बोलताना बजाज यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच आघाडी धर्माचे पालन करीत आली आहे, परंतु काँग्रेसनेच राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांचा आधीच प्रवेश करून घेतला आहे, त्यामुळे सुरुवात त्यांच्याकडूनच झाली आहे, हे आमदार मोहनराव कदम कसे विसरतात?
राज्यात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांची महाआघाडी आहे. या आघाडीची सर्व धोरणे आणि नियम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेहमीच पाळत आली आहे, असेही श्री. बजाज यांनी म्हटले आहे.