वड्डी येथे शेतकरी संघटनेने बंद पाडली ऊसतोड
प्रतिनिधी / मिरज
उसाला प्रति टन चार हजार रुपये दर द्यावा या मागणीसाठी रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेने मंगळवारी तालुक्यातील वड्डी येथे सुरू असलेली ऊसतोड बंद पाडली. उसाचा दर चार हजार रुपये जाहीर झाल्याशिवाय ऊसाची एक कांडीही कारखान्यापर्यंत जाऊ देणार नाही, असा इशारा यावेळी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिला. शेतकरी संघटनेचे महादेव कोरे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी या आंदोलनात भाग घेतला.
सन 2021-22 च्या गळीत हंगामाला नुकताच प्रारंभ झाला आहे. मात्र ऊस दर आणि एफआरपी समाधानकारक जाहीर झाल्याशिवाय कारखान्यांना ऊस देण्यास नकार देण्यात येत आहे. गुजरात येथील गणदेवी साखर कारखान्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एक टन ऊसासाठी चार हजार रुपये द्यावे अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. मात्र अद्याप शासनाने व साखर कारखान्यांनी एफआरपी आणि ऊस दर जाहीर केला नसल्याने कारखान्याला ऊस देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवारी दुपारी तालुक्यातील येथे एका शेतात मोठ्या प्रमाणावर ऊस तोड सुरू असल्याचे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते महादेव कोरे यांना समजले. त्यांनी कार्यकर्त्यांना सोबत घेऊन वड्डीतील शेतात जाऊन ऊस तोड बंद पाडली. उसाला टनामागे चार हजार रुपये दर मिळाल्याशिवाय उसाची एक कांडीही कारखान्यापर्यंत जाऊ देणार नाही. असा इशारा यावेळी त्यांनी दिला. दरम्यान रघुनाथदादा प्रणित शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ऊस तोड बंद पडल्याने एफआरपी आणि ऊस दरावरून आंदोलनाची पहिली ठिणगी मिरज तालुक्यात पडली आहे.