प्रतिनिधी / पलूस
आघाडी सरकारला ओबीसी समाजाचे राजकीय आरक्षण द्यायच नाही, हा त्यांचा स्पष्ट हेतू आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी राजकीय आरक्षण ठरल्याशिवाय स्थानिक स्वराज्य निवडणुका होवू देणार नाही. विधानसभा निवडणुकीत पलूसचा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. त्यामुळे विश्वजीत कदम विजयी झाले. ही चूक पुन्हा होणार नाही. ही जागा भाजपा लढवेल आणि २०२४ चा उमेदवार संग्राम देशमुख असेल, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान, मराठा समाजाला आरक्षण फक्त भाजपाच देवू शकते, हे आता माहित झाले आहे. त्यामुळे भाजपा सत्तेत येण्याची वाट लोक पहात आहे.
पलूस येथील भाजपाच्या नूतन कार्यालयाचे उद्घाटन व कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख, मकरंद देशपांडे, जि. प. सदस्या अश्विनीताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. स्वागत व प्रास्ताविक तालुकाध्यक्ष विजयकाका पाटील यांनी केले.
चंद्रकांत पाटील पुढे म्हणाले, मराठा समाज हा मागास आहे भाजपाने कोर्टात सिध्द करून दाखलले. ओबीसी समाजाला आरक्षणासाठी जनगणना नको आहे. स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका भाजपा स्वबळावर ताकदीने लढवेल. कार्यकर्त्यांनी आतापासूनच तयारीला लागावे २०१९ ला महापूर आला त्यावेळी भाजपा सरकारने तातडीने मदत दिली. स्थालांतरीत कुटुंबांना घरभाडे दिले. शेतकऱ्यांना भरीव अशी मदत दिली. यावेळचा महापूर येवून गेला तरीही अजून मदत मिळालेली नाही. भाजपाचे कार्यालय हे चळवळ केंद्र बनले पाहिजे. मोर्चे, आंदोलने, काढून लोकांच्या प्रश्नाला भिडा. तुमच्या तालुक्यातील मंत्र्यांच्या गाड्या आडवा. असाही सल्ला दिला.