रेल्वे प्रशासनाचा इशार. सोशल मीडियावरील अफवांमुळे प्रवाशांमध्ये संभ्रम
गाड्या रद्दबाबत रेल्वे प्रशासनच अनभिज्ञ
प्रतिनिधी / मिरज
गेल्या दोन दिवसांपासून काही रेल्वे गाड्या कायमस्वरूपी बंद होणार अशा अफवा पसरल्या होत्या. या वृत्ताला रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही. रेल्वे रद्दबाबत अधिकारीच अनभिज्ञ होते. काही रेल्वे गाड्या कायमस्वरूपी बंद होणार असे वृत्त पसरल्यानंतर प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. रेल्वे संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात होत्या. प्रवाशांकडून कोणत्याही सूचना न मागविता तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनाही विचारात न घेता गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने लोकप्रतिनिधीही संतप्त झाले होते.
याबाबत रेल्वे प्रशासनाकडे चौकशी केली असता, या गाड्या बंद होणार या अफवाच आहेत. याबाबत अधिकृत परिपत्रक रेल्वे प्रशासनाने काढले नसल्याचे सांगण्यात आले. मुसळधार पावसामुळे वसगडे-नांद्रे दरम्यान रेल्वेच्या ओव्हर ब्रिजचा भराव वाहून गेल्याने रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र कोणतीही रेल्वे कायमस्वरूपी रद्द केली नाही. ओव्हर ब्रिजचे काम झाल्यानंतर पूर्ववत रेल्वे सेवा सुरू होणार आहे. त्यामुळे कोणीही सोशल मिडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. दरम्यान, रेल्वे प्रशासनाविरोधात प्रवाशांमध्ये रोष निर्माण होणारी माहिती सोशल मीडियावर प्रसिद्ध केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे.