प्रतिनिधी/सांगली
कोयना धरणातून पाणी सोडण्याचे सध्या तरी कोणतेही नियोजन नाही. लोकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. धरण परिचालन सूचीतील मार्गदर्शक सूचनांनुसारच योग्य वेळी आधी जाहीर करून पाणी सोडले जाईल असे जलसंपदा विभागाने शनिवारी पुन्हा स्पष्ट केले आहे.
गेल्या दोन दिवसांमध्ये कोयनेमध्ये पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र तरीही धरण भरले, कोणत्याही क्षणी पाणी सोडले जाईल अशा अफवा उठत आहेत. त्यामुळे सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठचा भाग धास्तावलेला आहे. गत वर्षातील महापुराच्या कटू स्मृती मुळे कोयना आणि अलमट्टी तील जलसाठ्यांची चिंता वेगवेगळ्या अफवा मधून व्यक्त होऊ लागली आहे.
नागरिकांमधील भीतीचे वातावरण दूर व्हावे म्हणून कोयना सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी एक निवेदन प्रसिद्धीस दिले असून त्यामध्ये म्हटले आहे की, शनिवार दिनांक आठ ऑगस्ट रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत कोयना धरणात एकूण 71.55 टीएमसी पाणीसाठा आहे. पाण्याची पातळी 73.18 पर्यंत पोहोचल्यानंतर धरणाच्या सहा वक्रद्वार आणि सांडवा माझ्या पर्यंत पोहोचेल. कदाचित शनिवारी किंवा रविवारी ही पातळी गाठली जाईल. मात्र सध्या धरणातून विसर्जन करण्याचे कोणतेही नियोजन नाही. धरण परिचालन सुचित प्रमाणे आणि धरणातील पाण्याचा साठा, पावसाच्या पाण्याची होणारी आवक यांचा विचार करूनच पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल.
मात्र जेव्हा पाणी सोडले जाईल त्यापूर्वी त्याची कल्पना नागरिकांना विविध माध्यमातून दिली जाईल. सध्याच्या परिस्थितीत गेल्या काही दिवसांच्या तुलनेत पाण्याची आवक कमी झाली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवण्यात येऊ नये असे आवाहनही कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी केले आहे.
सांगलीची पाणीपातळी रात्रीत सहा इंचाने घटली
कृष्णेच्या खोऱ्यात पावसाने उसंत घेतल्याने विविध पुलांजवळ पाण्याच्या पातळीत घट नोंदवली गेली आहे. सांगलीत एका रात्रीत सहा इंच पातळी घटली. सकाळी साडेदहा वाजता 22.4 फुटावर आली आहे. सांगलीत आयर्विन ब्रिज पाणी पातळी – 22.4 फूट तर मिरजेच्या कृष्णा घाट येथे पाणी पातळी – 37-6 इतकी आहे.